Join us

तीन दिवसांनंतर एसटीची वाहतूक पूर्वपदावर; कोल्हापूर वगळता वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:31 IST

मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ पूर्णतः बंद आहेत.

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला जालना जिल्ह्यात लागलेल्या हिंसक वळणामुळे गेले तीन दिवस एसटीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, आता हळूहळू एसटीची वाहतूक पूर्वपदावर येत आहे.  

मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ पूर्णतः बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यामध्ये बंदचा प्रभाव अधिक होता, परंतु मंगळवारी या सर्व ठिकाणी एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, कोल्हापूरला केवळ बंद असल्याने, त्याचा एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

सव्वा पाच कोटी रुपयांचे नुकसानगेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटीच्या २० बसेस पूर्णता जळालेल्या आहेत, तसेच १९ बसेसची मोडतोड झाली आहे. यामुळे एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांत बंद असलेल्या आगारामुळे व इतर आगारातील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे ८ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

टॅग्स :बसचालक