हजारो एकर जमीन नापीक
By Admin | Updated: December 14, 2014 23:15 IST2014-12-14T23:15:57+5:302014-12-14T23:15:57+5:30
या प्रश्नाची दखल आता हिवाळी अधिवेशनातही घेण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

हजारो एकर जमीन नापीक
दत्ता म्हात्रे, पेण
जिल्ह्यातील पेण, अलिबाग, उरण, म्हसळा तालुक्यातील खारभूमी संरक्षक बंधारे समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीच्या तडाख्याने फुटले असून गेल्या चार ते पाच वर्षांत पिकत्या भातशेतीमध्ये उधाणभरतीचे खारे पाणी शिरून तब्बल २५००० एकर शेतजमीन नापीक झाली आहे. या प्रश्नाची दखल आता हिवाळी अधिवेशनातही घेण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
खारभूमी बंधारे बळकटीकरणास येणारा अपुरा विकास निधी व खारभूमी विभागाकडून केली जाणारी निकृष्ट दर्जाची कामे या प्रतिवर्षाच्या समस्येमुळे रायगडातील शेती व शेतकरीराजाला आजपर्यंत मदतीचा हात मिळाला नाही. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीवर विधिमंडळात चर्चा सुरू असताना शेकाप आ. धैर्यशील पाटील यांनी या समस्येवर प्रकाशझोत टाकून सत्ताधारी आणि विरोधकांना या समस्येची जाणीव करून खारभूमी प्रवण क्षेत्रातील बाधित असलेल्या खारेपाटात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर लावून धरली.
रायगडातील धरमतरवाडी, दादर खाडी, काळेश्री खाडी व कासू आमटेम परिसरातील निगडे, खाडीकिनारच्या संरक्षक बंधारे फुटून शेतीमध्ये खारे पाणी घुसले आहे. या परिसरातील खारभूमी भाल, मोठे भाल, कान्होबा, मसद, बेणेघाट,धरमतर जेट्टी, गडब, जुई, अब्बास, निगडे, पाले, दादर, रावे, सोनखार, मोठे वढाव, कणे, कोप्रोली या पेण तालुक्यातील १२ हजार एकर तर अलिबागमाील बहिरीचा पाडा, शहापूर, देहेन व बगळाबंदर परिसरातील १२ हजार एकर व उरण तालुक्याची हजार एक अशी तब्बल २५ हजार भातशेती उधाणभरतीच्या संकटाचा सामना नेहमीच करत आहे. एकेकाळी संरक्षक बंधाऱ्याची जोळ पद्धत बंद पडल्याने देखभाल दुरुस्ती शेतकऱ्यांची नवी पिढी करीत नाही. खारभूमी क्षेत्रातील सधन असलेली शेती व त्यामध्ये मिळणारे जिताडा प्रजातीचे रुचकर मासे अशा दोन्ही उत्पन्नावर शेतकरीवर्गाला हाती काहीच नसल्याने संकटाबाबत लक्ष न दिल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.