‘त्या’ २७ गावांतील कामकाज ठप्प
By Admin | Updated: June 6, 2015 23:06 IST2015-06-06T23:06:23+5:302015-06-06T23:06:23+5:30
‘त्या’ २७ गावांना १ जूनपासून पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेत सामावून घेण्याच्या राज्य शासनाच्या आदेशामुळे या ग्रामपंचायतींसह

‘त्या’ २७ गावांतील कामकाज ठप्प
डोंबिवली : ‘त्या’ २७ गावांना १ जूनपासून पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेत सामावून घेण्याच्या राज्य शासनाच्या आदेशामुळे या ग्रामपंचायतींसह तहसीलदारांची कामे ठप्प असून ते सर्व ‘दप्तर’ जमा करण्यात व्यस्त आहेत. यामुळे सहा दिवसांपासून या गावांत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नेमके आम्ही महापालिकेत आलो आहोत की नाही, असा संभ्रम त्यांच्यात असून ही नाराजी दूर करण्यासाठी येथे तत्काळ मूलभूत सुविधा देण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त मधुकर अर्दड यांच्याकडे शनिवारी केली.
या वेळी आयुक्तांनी या गावांना सामावून घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून शनिवारपासून तो विभाग महापालिकेचा ‘इ’ प्रभाग असेल, असे जाहीर केले. येथील समस्या सोडविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना नेमल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक वेळी नागरिक त्यांना भेटायला जाऊ शकत नसल्याचा युक्तिवाद आ. सुभाष भोईर यांनी केला. त्यावर, आयुक्तांंनी त्यासाठी येथे पूर्णवेळ प्रभाग अधिकारी (वॉर्ड आॅफिसर) देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणच्या सोयीसुविधांसह ‘दप्तर’आणि अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीने व्हावी, यासाठी बीडीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने होणारे काम हे डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील कार्यालयामधून पार पडेल, असे संकेतही त्यांनी दिले.