लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदान म्हणजे फटाके फोडणाऱ्यांसाठी हक्काची जागा मानली जाते. मात्र, उच्च न्यायालयाने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या क्षेत्रात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, स्थानिक रहिवाशांना ध्वनी प्रदूषणासोबत वायू प्रदूषणाचाही सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन (एलएम) तर्फे शिवाजी पार्क पोलिस स्थानकात निवेदन देऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाने शिवाजी पार्कात फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० अशी निश्चित केली आहे. मात्र, दरवर्षी या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असून, शेकडो लोक उशिरापर्यंत पार्कमध्ये फटाके फोडत राहतात. या अनियंत्रित ध्वनी व धुरामुळे ज्येष्ठ नागरिक, मुले व रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.
ध्वनिप्रदूषणात आघाडीवर; वयोवृद्ध, लहान मुलांना त्रास
दिवाळीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मोजणीत मरिन ड्राइव्ह प्रमाणे शिवाजी पार्कात सर्वात पुढे असते. येथे रात्री ११ पर्यंत १०० डेसिबल किंवा त्याच्याहून अधिक आवाजाचे फटाके फोडले जातात.
जमिनीवरून फटाक्यांच्या आवाजाचा अंदाज येत नसला तरी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. या आतषबाजीमुळे हवेतील प्रदूषणात मोठी वाढ होते. हे ध्वनी आणि वायू प्रदूषण वयोवृद्ध, तसेच लहान मुलांच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
कलाकार, खेळाडूंचीही जबाबदारी
शिवाजी पार्क परिसर हे मुंबईतील सर्वाधिक गजबजलेले आणि प्रतिष्ठित ठिकाण मानले जाते. येथे अनेक ज्येष्ठ नागरिक, कलाकार, तसेच खेळाडू राहतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे ही केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक जबाबदारीही आहे, असेही रहिवाशांनी यावेळी नमूद केले आहे.
Web Summary : Residents demand action against late-night firecrackers at Shivaji Park, a designated silence zone. High Court orders are being flouted, causing noise and air pollution, impacting the health of senior citizens and children. They urge responsible behavior from all.
Web Summary : शिवाजी पार्क, एक शांत क्षेत्र में, देर रात तक पटाखे फोड़ने के खिलाफ निवासियों ने कार्रवाई की मांग की। उच्च न्यायालय के आदेशों का उल्लंघन हो रहा है, जिससे ध्वनि और वायु प्रदूषण हो रहा है, जिससे वरिष्ठ नागरिकों और बच्चों के स्वास्थ्य पर असर पड़ रहा है। उन्होंने सभी से जिम्मेदाराना व्यवहार करने का आग्रह किया।