Join us  

हा बदनाम करण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा एसआयटीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 9:39 AM

युवा सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर रविवारी हल्लाबोल केला.

मुंबई : ज्यांना भाजप घाबरतो त्यांच्यावरच घाणेरडे आरोप केले जातात. त्यांचीच बदनामी केली जाते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले की, ते असे वातावरण निर्माण करतात. आरोप करणे त्यांचे धोरण आहे. त्यांना भीती वाटते, हे चांगले आहे, अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर रविवारी हल्लाबोल केला.

दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी आदित्य यांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बोलत होते. खोटे बोलायचे; पण रेटून बोलायचे, ही त्यांची सवय असून यंत्रणांचा गैरवापर या सरकारकडून होत असल्याची टीकाही आदित्य यांनी केली.

गुजरातचे हित महत्त्वाचे’

 युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी दिंडोशी येथे आयोजित केलेल्या ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य बोलत होते. विद्यमान सरकार ३१ डिसेंबरला पडणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

 राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले, आम्ही राज्यासाठी लढू. देश विकला, मात्र मुंबई आम्ही विकू देणार नाही. आरक्षणाचा मुद्दा आहेच, मात्र रोजगार हा मोठा मुद्दा आहे.

 हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नसून गुजरातच्या हिताचे असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना