युती-आघाडीविषयी संभ्रम कायम

By Admin | Updated: March 14, 2015 01:36 IST2015-03-14T01:36:25+5:302015-03-14T01:36:25+5:30

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी १११ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

There was confusion about the alliance | युती-आघाडीविषयी संभ्रम कायम

युती-आघाडीविषयी संभ्रम कायम

नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी १११ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. युती व आघाडीविषयी संभ्रम कायम असून, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. अंतिम प्रभाग रचना व मतदार याद्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुका काही दिवसांवर आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून यापूर्वीच अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ज्या प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या कमी आहे, ज्या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आहे व आरक्षणाचा काही फरक पडलेला नाही अशांना प्रचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा प्रभागामध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी मुलाखती सुरू केल्या आहेत. यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. पालिकेच्या स्थापनेपासून सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या गणेश नाईक यांच्यासमोर शिवसेना व भाजपाने आव्हान उभे केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसला होता. जनमत त्यांच्याविरोधात गेले होते. पालिकेमध्येही त्याचीच पुनरावृत्ती करून राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना - भाजपा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसनेही पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सद्यस्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. आघाडी व युतीची कोणतीच चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. दोन्ही काँगे्रसला निवडणुकीपूर्वीच फुटीचे ग्रहण लागले आहे. दोन्ही पक्षातून अद्याप जवळपास १२ नगरसेवक सेना व भाजपामध्ये गेले आहेत. राष्ट्रवादीला सत्ता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यांना काँगे्रसची साथ लाभल्यास सत्तेचा प्रवास सुकर होऊ शकतो. परंतु अद्याप तरी राष्ट्रवादीने स्वबळावर किमान ७० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शुक्रवारी नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पूर्ण ताकदीने निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सेना व भाजपा राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु युती झाली नाही तर त्यांच्या मतांचे विभाजन होईल. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँगे्रसला होणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय करणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. मनसे निवडणूक लढविणार का याविषयी संदिग्धता आहे. शेकाप, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष या सर्वांनी स्वबळावर निवडणुका लढण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title: There was confusion about the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.