Join us

मानखुर्दमध्ये दोन ते तीन आतंकवादी आल्याच्या कॉलने खळबळ

By मनीषा म्हात्रे | Updated: November 27, 2023 17:33 IST

मद्यपी कॉलरला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १५ व्या स्मृतदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन आंतकवादी आले आहे. त्यांची भाषा मला समजत नाही. त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे. त्यांच्याकडे बॅग आहे." या माहितीच्या कॉलने खळबळ उडाली.  मानखुर्द पोलिसांनी तत्काळ कॉलरला ताब्यात घेत चौकशी करताच दारूच्या नशेत त्याने तो कॉल केल्याचे समोर आले. 

मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉलरने " मानखुर्द पोलीस चौकी, एकता नगर या ठिकाणी दोन ते तीन आतंकवादी आले होते. त्यांची भाषा मला समजत नाही. त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे त्यांच्याकडे बॅग आहे. त्यांनी कॉलरला बाथरूमला जाण्याचा रस्ता विचारला." असे सांगून कॉल कट केला.

मानखुर्द सारख्या संवेदनशील ठिकाणी अशाप्रकारे कॉल आल्याने पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरु केली. एकता नगर या ठिकाणी शोध घेतला मात्र संशयित व्यक्ती  मिळून आले नाहीत. अखेर कॉलरला पुन्हा कॉल केला मात्र त्याचा फोन बंद लागला. कॉलर ने त्याचा मोबाईल स्विच ऑफ  केलेला दिसून आला. कॉलरच्या लोकेशनवरून त्याचा शोध घेतला असता तो एकता नगर, मानखुर्द येथे त्याच्या राहत्या घरी मिळून आला. किशोर लक्ष्मण ननावरे असे कॉलरचे नाव असून तो मद्यपी निघाला.

अखेर सीसीटिव्हीतून सत्य समोर

त्याच्या कडे केलेल्या चौकशीत, तो बार येथून दारू पिऊन घरी जात असताना, एका इसमाने त्याचा मोबाईल फोन करण्याकरिता मागितला, कोणाला फोन लावला हे त्याला माहित नाही. फोनवर बोलत कॉलरला त्याच्या घराजवळ सोडून कॉलर निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी  कॉलरच्या बोलण्यात तथ्य आहे किंवा कसे याबाबत सीसीटिव्ही फुटेज तपासले. मात्र, कोणीही संशयित आतंकवादी दिसून आले नाही. माहिती खोटी असल्याचे चौकशीत निष्पन्न होताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारी