पावसाळा आला तरी स्थानकावर छप्पर नाही
By Admin | Updated: June 9, 2014 01:58 IST2014-06-09T01:58:46+5:302014-06-09T01:58:46+5:30
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने या वर्षी रेल्वे प्रवासी ओलेचिंब होणार आहेत.

पावसाळा आला तरी स्थानकावर छप्पर नाही
कसारा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील कसारा रेल्वे स्थानकावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने या वर्षी रेल्वे प्रवासी ओलेचिंब होणार आहेत.
दहा दिवसांपूर्वी कसारा परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात कसारा गावातील अनेक घरांचे पत्रे तर उडालेच. पण याबरोबर रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. ४ वरील पत्रे मोठ्या प्रमाणात उडून गेले होते. फलाटावरील पत्र्यांसह काही कार्यालयांवरील पत्रेदेखील उडाले आहेत. आजमितीस दहा दिवस उलटूनही रेल्वे प्रशासनाने पत्रे बसविण्याची तसदी न घेतल्याने या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पावसाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानकात आधीच प्रवाशांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. यात रेल्वे फलाटावरील अपुरे व अस्वच्छ शौचालय, बंद पंखे, पिण्याचा पाण्याचा अभाव, घाणीचे साम्राज्य, फलाटावर असलेली दारुड्यांची वर्दळ, मोकाट जनावरे ही तर रोजचीच समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवासी सोसत आहेत. त्यात आता पत्रे उडून गेल्यामुळे भर पडली आहे. (वार्ताहर)