तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही नाही
By Admin | Updated: July 7, 2014 00:17 IST2014-07-06T21:43:06+5:302014-07-07T00:17:21+5:30
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्या तसेच कालव्याद्वारे शेती सिंचन करणार्या शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही पडला नसल्याने भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयांनी तळ गाठायला सुरु वात केली

तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही नाही
भरत उबाळे,
आसनगाव : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्या तसेच कालव्याद्वारे शेती सिंचन करणार्या शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात पावसाचा टिपूसही पडला नसल्याने भातसा, तानसा, मोडकसागर या जलाशयांनी तळ गाठायला सुरु वात केली असून पाण्याखालचा भाग उघड्यावर आल्याने भेगाळू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलाव क्षेत्रात दरवर्षी संततधार पाऊस कोसळत असतो. मात्र, या वर्षीच्या हंगामात पाऊसाचा टिपूसही पडला नसल्याने धरणांची पाण्याची पातळी मातीला भिडली आहे. तानसा व मोडकसागर धरणास मिळणारी वैतरणा नदी कोरडी पडली आहे. भातसा धरणास मिळणार्या चोरणा, भातसा व मुमरी या नद्यांनीदेखील तळ गाठला आहे. धरणांची पाण्याची पातळी खाली गेल्याने आतापर्यंत पाण्याखाली असलेल्या टेकड्या, झुडुपे, जीवाश्म बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत. धरण क्षेत्रातल्या आदिवासी वस्त्यांनी कोरड्या पडलेल्या धरण भागात प्रवेश करून खड्डे खोदून पिण्याचे पाणी मिळवणे सुरू केले आहे. काहींनी मासेमारी सुरू केली आहे. धरणांची पाण्याची पातळी घटल्याचा फायदा उठवत काही व्यावसायिकांनी येथे बेकायदा वाळुउपसा सुरू केला आहे. मागील वर्षी जून महिनाअखेरीसच भातसा, वैतरणा, तानसा धरणे तुडुंब भरून वाहत होती. या वर्षी तशी स्थिती नसल्याने धरणांची पाण्याची पातळी खालावली आहे.
सध्या तानसा १०,०८५, मोडकसागर ५७,०७६, तर भातसामध्ये ३३७८ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे .
भातसा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी मे महिन्यापासून बंद केले आहे. त्यामुळे पाऊस तर नाहीच, परंतु कालव्याचे पाणी शेतीला जीवदान ठरले असते.
> ४२ गावांच्या नळपाणीपुरवठा योजना भातसा नदीवर अवलंबून असल्याने दरदिवशी कपातीनुसार पाणी सोडले जाते.
> धरणे कोरडी पडू लागल्याने पाण्याच्या शोधासाठी आदिवासी वस्त्या धरणात प्रवेश करून खड्डे खोदून पाणी मिळवत आहेत. उथळ पाण्यात मासेमारी केली जात असून वाळूचाही बेकायदा उपसा सुरू आहे.
> पाणी आटू लागल्याने धरणातल्या टेकड्या, झुडुपे उघड्यावर आली आहेत.