मुंबई - साध्या लोकलच्या तिकिटातच एसीचा प्रवास करायला मिळणार असेल तर उत्तमच; मात्र या निर्णयामुळे एसी लोकलमधील गर्दी वाढेल. सकाळी गर्दीच्या वेळी एसी लोकलचे दरवाजे बंद होताना मारामार असते.
हा निर्णय चांगला असला तरी पुन्हा मग एसी लोकलच्या फेऱ्या वाढवाव्या लागतील. त्याचा ताण उर्वरित लोकल सेवेवर येणार तर नाही ना? या सगळ्याचा विचार करावा लागेल. थोडक्यात हे सगळे अपघात कमी होण्यासाठी होत असेल तर त्याचे स्वागतच असल्याचे रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी संघाने म्हटले आहे.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी यशवंत जडयार म्हणाले, एसी लोकल सेकंड क्लासच्या दरात चालवाव्यात. त्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल. एसी लोकल आल्यापासून आम्ही हीच मागणी करत आहोत. ज्या लोकांना महिन्याला बारा ते पंधरा हजार पगार आहे, त्या लोकांनी विरार ते चर्चगेटदरम्यानच्या एसी प्रवासासाठी महिन्याला २ हजार २५० रुपये कुठून आणायचे? म्हणून सेकंड क्लासच्या डब्यात गर्दी होत असून, अपघात होत आहेत.
लोकल प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहेत? यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. केवळ लोकलच्या तिकिटात एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा दिल्यानंतर समस्या सुटतील, असे नाही. फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. डब्यांची संख्या वाढविली पाहिजे.- हृदयनाथ म्हात्रे, मुंबई रेल प्रवासी संघ
लोकलचे साधे भाडे व एसी लोकलचे भाडे यात सध्या बरीच तफावत आहे. परंतु जर साध्या भाड्यात एसीचा प्रवास दिला तर चेंगराचेंगरीचे प्रमाण वाढेल. त्यापेक्षा लोकल डबल डेकर सुरू करण्यावर भर द्यावा. त्यांची रचना गर्दीमध्ये चढता उतरताना व्यवस्थित होईल, अशी करावी.- दिनेश हळदणकर, प्रवासी
एसी लोकलच्या भाड्यात कपात करून जर नॉर्मल लोकलच्या भाड्यामध्ये जर सर्व प्रवाशांना प्रवास करायला मिळत असेल तर ते अतिशय योग्य निर्णय असेल. आम्ही याचे स्वागत करतो.- राजू कांबळे, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ