चोरीचा ३ कोटी ४४ लाखांचा ऐवज केला परत
By Admin | Updated: January 8, 2015 00:45 IST2015-01-08T00:45:45+5:302015-01-08T00:45:45+5:30
चोरी झालेला सोने, चांदी, मोबाइल यासारखा ऐवज परत मिळण्याची शक्यता विरळच किमान घटनेचा योग्य तपास होऊन आरोपींना पकडण्याची अपेक्षा फिर्यादींंकडून केली जाते.

चोरीचा ३ कोटी ४४ लाखांचा ऐवज केला परत
नवी मुंबई : चोरी झालेला सोने, चांदी, मोबाइल यासारखा ऐवज परत मिळण्याची शक्यता विरळच किमान घटनेचा योग्य तपास होऊन आरोपींना पकडण्याची अपेक्षा फिर्यादींंकडून केली जाते. मात्र या गुन्ह्यांचा कौशल्याने तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या नवी मुंबई पोलिसांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. गुन्ह्यांची उकल करून तब्बल ३ कोटी ४४ लाखांचा मुद्देमालाचे पोलीसांकडून तब्बल ९८ फिर्यादींच्या बुधवारी वाटप करण्यात आले. यावेळी चोरलेले दागिने पोलीसांकडून परत घेताना फिर्यादिंच्या चेहऱ्यांवर हसू फुलले होते.
शहरात घरफोडी, सोनसाखळीचोरी, अपहार या गुन्ह्यांतील गुन्हेगारांनी चोरलेला ३ कोटी ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी छडा लावून जप्त
केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी हा मुद्देमाल संबंधितांना परत देण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे आयुक्त के. एल. प्रसाद यांनी सांगितले. गुन्हा घडत असताना नागरिकांनी एकजुटीने प्रतिकार केल्यास गुन्हा टळू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरात सोनसाखळीचोरीच्या सर्वाधिक घटना घडतात. त्यामध्ये सौभाग्याचे लेणे चोरीला जात असल्याने महिलांच्या भावनिकतेचा प्रश्न असतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेही आयुक्त प्रसाद यांनी कौतुक केले.
घरामध्ये तसेच सोसायटी आवारात आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. परंतु एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या किमतीपेक्षा आपले प्राण मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी सीसीटीव्ही बसवण्याचा सल्ला नागरिकांना दिला. नागरिकांनी सतर्क राहिल्यास गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील, उपआयुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप, विश्वास पांढरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीसांकडून परत करण्यात आलेला ऐवज
वस्तूनग/ संख्याकिंमत
सोने ३१२ तोळे९५,२७,०८९
ट्रक/ट्रेलर१२१,१९,३९,२७९
टेंपो०४२०,००,०००
कार०७४८,४०,०००
मोटारसायकल१५५,५५,०००
वायर०१६,०८,५००
मोबाइल०८६६,४००
लॅपटॉप०१२०,०००
प्लॅस्टिक दाणा१४९ बॅग३,६६,२४२
साउंड०५३,१०,०००
टायर०१२१,०००
रोख रक्कम०५१,४२,६९०
केमिकल४०ड्रम१२,००,०००
अॅल्युमिनियम०३२४,८६,३००
एक्सरसाईज बुक१८०नग९०,०००
एकूण ०३,४४,५५,३०८
साऊथ कोरिया येथून शिक्षणासाठी खारघर येथे आलेल्या जिआॅन साँग या परदेशी तरुणीचा मोबाइल चोरीला गेला होता. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र तुझा गेलेला मोबाइल परत मिळणार नाही असे अनेकांनी तिला सांगितले होते.
त्यामुळे हताश झालेल्या जिआॅन हिने देखील मोबाइल परत मिळेल याची आशा सोडली होती. मोबाइलमध्ये तिचे महत्त्वाचे फोन नंबर व इतर माहिती होती. त्यामुळे याचा फटका या परदेशी पाहुणीला बसला होता. मात्र तब्बल चार महिन्यानंतर पोलिसांनी चोराला अटक करून चोरीला गेलेला मोबाइल जप्त केला.
खारघर सेक्टर १२ येथे राहणाऱ्या वैशाली जाधव यांना मारहाण करून त्यांच्या घरातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. हा ऐवज परत मिळेल अशी आशाही नव्हती. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर गुन्हेगाराला अटक करून हा ऐवज परत मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून हा ऐवज लुटला होता, तर अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी त्यांना तो परत सोपवला आहे.
न्हावा शेवा परिसरात कंटेनरमधून माल चोरीच्या घटना घडत आहेत. न्हावा शेवा ते पनवेल प्रवासादरम्यानच या चोऱ्या होत आहेत. त्यामध्ये गुन्हेगारांच्या स्थानिक टोळ्या सक्रिय असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचीही शक्यता आहे.
- के. एल. प्रसाद, आयुक्त , नवी मुंबई पोलीस