मजुरांचा आर्त आक्रोश... जीवाची नाही किंमत!
By मनीषा म्हात्रे | Updated: March 2, 2026 07:35 IST2026-03-02T07:34:59+5:302026-03-02T07:35:08+5:30
धोक्याची ही साखळी केवळ कामगारांपुरती मर्यादित नाही. अनेक ठिकाणी बांधकामस्थळी योग्य संरक्षक आडोसे, जाळ्या नसल्याने सिमेंटचे तुकडे, लोखंडी रॉड किंवा साहित्य खाली पडते आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक जखमी होतात.

मजुरांचा आर्त आक्रोश... जीवाची नाही किंमत!
- मनीषा म्हात्रे
उपमुख्य उपसंपादक
बई या स्वप्ननगरीत दररोज हजारो तरुण-तरुणी आपले भविष्य घडवण्यासाठी, स्वप्न साकारण्यासाठी किंवा हाताला काम मिळवण्यासाठी येतात. अनेकजण ‘जीवाची मुंबई’ करण्यासाठी घरदार सोडून येतात. पण अशा तरुणांवर यथावकाश महानगराच्या अफाट वेगाने होणाऱ्या विकासात कंत्राटी मजूर म्हणून काम करण्याची वेळ येते. अनेकदा हाच विकास त्यांचा जीव घेतो. त्यांच्यापैकी कुणाचा, कधी, कुठे बळी जाईल, याचा नेम नसतो. मुलुंड येथे मेट्रो प्रकल्पातील अपघात असो किंवा चेंबूरमधील बांधकामाधीन इमारतीवरून सहा मजुरांचे कोसळणे असो, या दुर्घटना केवळ अपघात नाहीत; त्या विकासाच्या मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या आहेत.
चेंबूरमध्ये सहा कामगार इमारतीवरून कोसळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. एका क्षणात एका कुटुंबाचा कर्ता हरपला. त्यांच्या घरातली चूल आता कोणाच्या आधारावर पेटणार? अशा प्रत्येक घटनेनंतर काही दिवस संताप व्यक्त होतो, चौकशीचे आदेश दिले जातात, भरपाई जाहीर होते; पण काही दिवसांत सगळे शांत होते. मात्र ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्यांच्यासाठी ही शांतता अधिक वेदनादायी असते.
मुंबईसारख्या महानगरात मेट्रो, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारतींचे जाळे झपाट्याने वाढत आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची घाई, स्पर्धा आणि आर्थिक दबाव यामुळे कंत्राटी मजूर आणि अन्य सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, मजबूत स्कॅफोल्डिंग, संरक्षक जाळी हे सर्व नियम कागदोपत्री असतात; प्रत्यक्षात त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. कामगारांना पुरेसे प्रशिक्षणही दिले जात नाही. परिणामी, एखादी छोटी चूक थेट जीवावर बेतते.
धोक्याची ही साखळी केवळ कामगारांपुरती मर्यादित नाही. अनेक ठिकाणी बांधकामस्थळी योग्य संरक्षक आडोसे, जाळ्या नसल्याने सिमेंटचे तुकडे, लोखंडी रॉड किंवा साहित्य खाली पडते आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक जखमी होतात. रोजच्या धावपळीत आपले काम आटोपण्यासाठी निघालेला सामान्य माणूस अचानक अपघाताचा बळी ठरतो. ‘विकास’ या शब्दामागे दडलेला हा जीवघेणा धोका आपण किती काळ दुर्लक्षित करणार?
कामगारच प्रकल्पाचे खरे शिल्पकार
कामगार हे प्रकल्पांचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या घामावर शहरे उभी राहतात. तरीही त्यांच्या सुरक्षित निवास, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण आणि सुरक्षा तपासणी या गरजांकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहिले जाते. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी केवळ नफ्याकडे न पाहता मानवी जीविताला प्राधान्य द्यायला हवे. सरकारी यंत्रणांनीही औपचारिकता न उरकता कठोर आणि पारदर्शक कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिसांनीही अशा घटनांचे गुन्हे त्वरित नोंदवून चौकशी करायला हवी.