ठाणे :दोन तालुक्यात तीव्र टंचाई
By Admin | Updated: June 1, 2015 22:42 IST2015-06-01T22:42:08+5:302015-06-01T22:42:08+5:30
ठाणे, या जिल्ह्यांतील शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई असून १२८ गाव,पाड्यांना तर पालघर जिल्ह्यांतील जव्हार, विक्रमगड

ठाणे :दोन तालुक्यात तीव्र टंचाई
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे, या जिल्ह्यांतील शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई असून १२८ गाव,पाड्यांना तर पालघर जिल्ह्यांतील जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा या चार तालुक्यांतील सुमारे १४७गावपाड्यांंना सुमारे ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या जीवघेण्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड देत असलेले गावपाडे होरपळून निघत आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी तो कमी पडत असल्यामुळे बहुतांशी गावपाड्यांमधील ग्रामस्थांना जंगलातील विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. ठाणे जिल्ह्यातील १२८ गावपाडे तर पालघर जिल्ह्यातील १४७ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ हे चार तालुके वगळता उर्वरित शहापूर व मुरबाड या दोन तालुक्यांतील ग्रामस्थ पाणीटंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यात सर्वाधिक १०२ गावपाडे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. यामध्ये २३ गावांसह ७९ पाड्यांचा समावेश आहे. या सर्व गावपाड्यांना १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात २६ गावपाड्यांत पाणीटंचाई आहे.