ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा पर्यावरणाशी संबंधच उरला नाही...
By सचिन लुंगसे | Updated: June 5, 2025 13:22 IST2025-06-05T13:22:11+5:302025-06-05T13:22:36+5:30
या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडतील

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा पर्यावरणाशी संबंधच उरला नाही...
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नंदुरबार, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांची पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमताच उरलेली नाही. इथे ना पायाभूत सोयी सुविधा आहेत, ना पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठीची व्यवस्था. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ, अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा अशा घटना घडत जातील.
पिकामध्ये दाणे भरून येण्याच्या आणि फळे लागण्याच्या प्रक्रियेवरच मोठे गंभीर परिणाम होतील. तर धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा हे जिल्हे काही प्रमाणात वातावरणातील बदलाला तोंड देऊ शकतील मात्र वातावरणातले बदल वाढले तर या जिल्ह्यांची अवस्था ही वरच्या पाच जिल्ह्यांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. ॲसेसिंग क्लायमेट चेंज रिझिलियन्स इन सेंट्रल इंडियन ॲग्रिकल्चर : अ रिजनल इंडिकेटर-बेस्ड ॲप्रोच ॲण्ड ॲग्रो-क्लायमेट झोन मॅपिंग हा शोधप्रबंध एप्रिलमध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायरोन्मेंट अँड क्लायमेट चेंजमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात हे धक्कादायक निष्कर्ष मांडले आहेत.
होणाऱ्या बदलांना तोंड देण्याची क्षमताच नाही
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांना अनियमित पावसाचा वारंवार फटका बसेल. पर्यावरणाला पूरक अशा सोयी सुविधा वाढत नाहीत शिवाय जमीन तुकड्यांमध्ये विभागल्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्र माहिती आणि प्रशिक्षण सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत आहे या सगळ्यांचा परिणाम बिघडत जाणाऱ्या पर्यावरणावर होत आहे. कमी प्रतिकारक्षमतेच्या जिल्ह्यांमधील पिकाखालील क्षेत्राला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांच्या अभ्यासात सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांची वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता पुरेशी नाही. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, जळगाव आणि इतर जिल्हे वातावरण बदलासंदर्भात उच्च प्रतिकारक्षमतेचे आहेत. तर सातारा, नंदुरबार आणि कोकण किनारपट्टीवर जिल्हे यांसारखे भाग वातावरणीय दृष्टिकोनातून अधिक असुरक्षित म्हणजेच मध्यम/कमी प्रतिकारक्षम आहेत.
उपाययोजनेत सातत्य नाही
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, जळगाव, नागपूर, सोलापूर, लातूर आणि इतर जिल्हे उच्च प्रतिकारक्षमता असलेल्या गटात येतात. या भागांमध्ये वातावरण बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता अधिक आहे. गडचिरोली, गोंदिया आणि धुळे हे जिल्हे मध्यम प्रतिकारक्षमता दर्शवतात. कारण या भागांमध्ये संसाधनांची उपलब्धता मर्यादित आहे. उत्पन्नाचे विविध पण अस्थिर स्रोत आहेत. या भागांमध्ये तंत्रज्ञानाचा मर्यादित प्रसार असल्यामुळे वातावरण बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना सातत्याने राबवल्या जात नाहीत.
प्रतिकारक्षमता म्हणजे?
वातावरण बदलासंदर्भातील प्रतिकारक्षमता म्हणजे अचानक होणाऱ्या अतिवृष्टी, तापमानवाढ किंवा दुष्काळ यांसारख्या घटनांसाठी तयार राहण्याची आणि त्यांचा सामना करण्याची एखाद्या भागाची किंवा प्रदेशाची क्षमता होय. प्रतिकारक्षमता जास्त असते, तेथे वातावरणीय घटनांमुळे होणारे नुकसान किंवा असुरक्षितता कमी असते; आणि प्रतिकारक्षमता कमी असते, तेथे धोका आणि अनिश्चितता अधिक असते.