ठाणे, पालघरमध्ये ११,४०४ जागा कमी
By Admin | Updated: June 8, 2015 23:26 IST2015-06-08T23:26:21+5:302015-06-08T23:26:21+5:30
यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३३ हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठाणे, पालघरमध्ये ११,४०४ जागा कमी
अजित मांडके, ठाणे
यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दहावीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३३ हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण ४.२६ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आता आपले आवडते महाविद्यालय मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण, ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत पुरेशा जागा असल्या तरी, विद्यार्थ्यांच्या पास होण्याच्या तुलनेत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये १ लाख २२ हजार २६३ च्या आसपास जागा आहेत. म्हणजेच दोन्ही जिल्ह्यांत अकरावीच्या ११,४०४ जागा कमी पडणार आहेत.
विशेष म्हणजे, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय असून ते पाहता यंदा अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वांधे होणार असल्याचे चित्र आहे. तर ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठीदेखील विविध शाखांच्या २५ हजार ९१३ जागा आहेत. एकूणच ठाणे-पालघर जिल्ह्यांत विद्यार्थ्यांना अॅडमिशनचे टेन्शन असले तरी ठाणे शहरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मात्र त्याचे टेन्शन असणार नाही.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत यंदा १० दहावीच्या परीक्षेत एकूण १ लाख ४४ हजार ९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख ४३ हजार ७१० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३३ हजार ६६७ विद्यार्थी पास झाले. जिल्ह्यांत असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये सद्य:स्थितीत आॅनलाइनच्या १ लाख २२ हजार २६३ जागा आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी ३९९५०, विज्ञान २३३५० आणि कला शाखेत १४५४० जागा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत कला शाखेत ३ हजारांनी जागा कमी झाल्या असल्या तरी कॉमर्स आणि सायन्स शाखेत जागा वाढल्या आहेत. परंतु, मॅनेजमेंट कोटा ५० टक्के, व्यवस्थापन ५, इनहाऊस २०, कला क्षेत्र २, क्रीडा ३ आणि शारीरिक अपंगत्व ३ टक्के कोटा आहे. अशा मिळून जिल्ह्यांंत सध्या तरी १ लाख २२ हजार २६३च्या आसपास जागा आहेत.
वसईमध्ये बायोफोकल सायन्स इलेक्ट्रॉनिक्स ३२५, बायोफोकल कॉम्प्युटर सायन्स ९९५, कॉमर्स बँकिंग १५० आणि आॅफिस मॅनेजमेंट ५० जागा आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातही सायन्ससाठी ५,५००, कॉमर्ससाठी ९,८४० आणि आर्टससाठी ३,८०० जागा आहेत.
ठाणे शहराचा निकालही ८९.९७ टक्के लागला आहे. यंदा शहरातून २२ हजार १७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २० हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५१० ने कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शहरात अॅडमिशनचे टेन्शन असणार नाही. शहरात असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये आजघडीला २५ हजार ९१३ जागा आहेत. यामध्ये कला विभागासाठी ३६ महाविद्यालयांमधून ४ हजार १००, वाणिज्य विभागासाठी ६८ महाविद्यालयांतून १० हजार ९९०, विज्ञान विभागासाठी ५५ महाविद्यालयांतून ७ हजार ६२० जागा असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी मुंबईमध्ये विविध महाविद्यालयांमधून एकूण १८७५० जागा असून बायोफोकल सायन्स, इलेक्ट्रीकल मेंटेनन्स १५०, बायोफोकल सायन्स इलेक्ट्रॉनिक्स ७७०, बायोफोकल कॉम्प्युटर सायन्स १२५०, बायोफोकल कॉमर्स बँकिंग २०० जागा आहेत. याशिवाय कला शाखेत ८९०, कॉमर्स ८१३० आणि सायन्स शाखेत ७३६० जागा आहेत.
कल्याण-डोंबिवलीतही कला शाखेसाठी ४ हजार ५६०, वाणिज्यसाठी १२ हजार ५८० आणि विज्ञान शाखेत ६,९५० जागा आहेत. याशिवाय उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये कला २,८००, वाणिज्य ८,५८० आणि विज्ञान शाखेत ६ हजार ९४० जागा
आहेत.
कल्याण डोंबिवलीत ५९ शाळा १०० नंबरी
सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९० पेक्षा अधिक टकके मिळविण्याची स्पर्धा कल्याण डोंबिवलीत पहावयास मिळाली. यात डोंबिवलीतील २१ तर कल्याणमधील ३८ शाळांचा निकाल १०० टकके लागला आहे. निकालामध्ये सर्वाधिक टक्के मिळविणाऱ्या शाळांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठया प्रमाणावर आहेत. दुपारी १ च्या सुमारास वेबसाईटवर जाहीर झालेला निकाल विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि घरबसल्या संगणकावर पाहणे पसंत केले. शाळांनाही निकालाची उत्सुकता लागून राहीली होती. गतवर्षी डोंबिवलीतील १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यंदा हा आकडा २१ वर पोहोचला आहे.
1या निकालाचा आढावा घेता यात शहरातील आर.बी.टी हायस्कूल, सिस्टर निवेदिता इंग्रजी आणि मराठी माध्यम, मॉडेल इंग्लिश स्कूल, होली एंजल्स इंग्लिश स्कूल, ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कू ल, चंद्रेश लोढा मेमोरीयल स्कूल(निळजे ), सी.एम.एस स्कूल, वेलंकणी इंग्लिश स्कूल, रोटरी मूक-
क र्णबधीर शाळा, मंजुनाथ, ग्रीन इंग्लिश, आदर्श, एस आय ए, किडलँण्ड इंग्लिश, चारू बामा म्हात्रे, सेंट मेरी, डॉन बॉस्को चंद्रकांत पाटकर मराठी माध्यम,अशा २१ शाळांचा समावेश आहे. येथील रोटरी शिवाई बालक मंदिर या शाळेचा निकाल ही ९८ टक्के निकाल लागला आहे.
2 कल्याणमधील लोककल्याण, सेंट मेरी, सम्राट अशोक, एस टी वाय एस, रॉयल इंग्लिश, सेंट जिझस, भाऊराव पोटे, के.सी गांधी, होली क्रॉस, वाणी विद्यालय, सेंट थॉमस, गुरू नानक, आॅक्सफर्ड, न्यू इरा, स्वामी विवेकानंद, साकेत विद्यालय, एन आर सी स्कू ल, आर एस जी रामजी, मोहनलाल देढीया, वेलंकणी, सरस्वती विद्यामंदीर, राजीव गांधी विद्यालय, भगवान भोईरइंग्लिश स्कूल यांसह एकूण ३८ शाळांचा निकाल १०० टकके लागला आहे.
उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढल्याने आवडती महाविद्यालये होणार दुर्लभ
ठाणेकर विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या ठाण्यातील काही महत्त्वाच्या महाविद्यालयांतदेखील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी झुंबड उडणार आहे. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीदेखील विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत जागा उपलब्ध असल्या तरी पास होण्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयांत प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. यामध्ये सायन्स बायोफोकलमधील इलेक्ट्रीकल मेंटेनन्स २६८, इलेक्ट्रॉनिक्स १,२५० आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये १,११५ जागा उपलब्ध आहेत. तसेच द्विलक्षी वाणिज्य शाखेत बँकिंग २७०, कॉमर्स आॅफ मॅनेजमेंट ४५ जागा आहेत.