ठाणे महापालिकेत पाच प्रभागांत १८ जानेवारीला होणार मतदान
By Admin | Updated: December 20, 2014 22:47 IST2014-12-20T22:47:05+5:302014-12-20T22:47:05+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता ठाणे महापालिकेत पाच प्रभागांच्या पोटनिवडणुकींचे पडघम वाजले असून येत्या १८ जानेवारी रोजी या प्रभागात पोटनिवडणुक होणार आहे.
ठाणे महापालिकेत पाच प्रभागांत १८ जानेवारीला होणार मतदान
ठाणे - लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता ठाणे महापालिकेत पाच प्रभागांच्या पोटनिवडणुकींचे पडघम वाजले असून येत्या १८ जानेवारी रोजी या प्रभागात पोटनिवडणुक होणार आहे. कॉंग्रेसमधून शिवसेनेत डेरेदाखल झालेले रवींद्र फाटक यांच्यासह त्यांच्या पत्नी हे यावेळी शिवसेनेतून नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, भाजपाने अद्यापही आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवल्याने त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा या निमित्ताने स्वबळावर मैदानात उतरली तरी ही आगामी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणावी लागणार आहे.
मुंब्य्रातील प्रभाग क्र. ६१ अ मध्ये अब्दुल रऊफ खान आणि प्रभाग क्र. ६३ अ मधील रझिया शेख या दोनही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध्य ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद बाद झाले आहे. दुसरीकडे वागळेत विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी आापल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता प्रभाग क्र. १३ अ, प्रभाग क्र. ३४ अ आणि ब अशा एकूण पाच जागांसाठी नव्या वर्षात म्हणजेच १८ जानेवारीला निवडणुक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या २३ ते २७ डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून यामध्ये कोणकोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने फाटक दाम्पत्याचेही पुढील राजकीय कारर्कीद स्पष्ट होणार आहे.
दरम्यान सध्या पालिकेत शिवसेना ५३, भाजपा ८, रिपाइं १, बसपा २ आणि एक अपक्ष असे मिळून सत्ताधारी शिवसेनेकडे ६५ चे संख्याबळ आहे. तर दुसरीकडे लोकशाही आघाडीकडे राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक होते. परंतु दोघांचे नगरसेवक बाद झाल्याने त्यांची संख्या ३२ झाली आहे. तर कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने, कॉंग्रेसची संख्या १८ वरुन १५ वर आली आहे. त्यांच्या गोटात मनसेचे सात, अपक्ष सहा असे मिळून ६५ चे संख्याबळ होते. परंतु आता त्यातील पाच नगरसेवकांचे संख्याबळ घटले आहे. त्यामुळे या पाचही जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी लोकशाही आघाडी तयारीला लागली आहे. दुसरीकडे भाजपाने अद्यापही आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवल्याने ते कोणता निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)