बेपर्वाईचाच दहशतवाद
By Admin | Updated: November 23, 2015 01:17 IST2015-11-23T01:17:12+5:302015-11-23T01:17:12+5:30
फ्रान्सवर नुकताच भीषण हल्ला झाला आणि मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. यापूर्वी मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते

बेपर्वाईचाच दहशतवाद
ठाणे- फ्रान्सवर नुकताच भीषण हल्ला झाला आणि मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. यापूर्वी मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. अमेरिकेतील टिष्ट्वन टॉवरवर विमाने आदळवून जमीनदोस्त केले गेले. फ्रान्स असो की अमेरिका वा मुंबई अतिरेकी कारवाया करणारे कधी, कुठे, कसा उत्पात घडवतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या घटना घडेपर्यंत असे काही घडू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण होते. दाट लोकवस्तीची शहरे असलेला ठाणे जिल्हा हेही कदाचित अतिरेक्यांचे पुढील लक्ष्य असू शकते. गतवर्षी कल्याणमधील चार तरुण इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी एक तरुण परतला तर दुसरा मरण पावला, असा दावा गुप्तचर यंत्रणा करतात. मात्र अन्य दोन तरुण आजही इसिसमध्ये सक्रीय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचेच म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शहरांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारा हा वृत्तांत...
ठाणे शहरातील मॉलची सुरक्षा बिनहत्यारीच
पॅरीसमध्ये झालेल्या अतिरेकी हल्लयासारखा सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला ठाण्यातील बड्या मॉलमध्ये झाला तर तेथे हजर असलेल्या हजारो लोकांची सुरक्षा करण्याकरिता सशस्त्र पोलीस किंवा खासगी सुरक्षा या मॉलमध्ये नाही. पोलीस अथवा लष्कराचे कमांडो दाखल होईपर्यंत शेकडो लोकांना प्राण गमवणे अपरिहार्य आहे. फ्रान्समध्ये गर्दीच्या ठिकाणांना अतिरेक्यांनी लक्ष्य केले. मुंबईवर २६-११ रोजी हल्ला झाला तेव्हाही पंचतारांकित हॉटेल व छत्रपती शिवाजी टर्मिनस यासारखी गर्दीची ठिकाणे लक्ष्य केली गेली होती. ठाण्यातील विवियाना व कोरम मॉलमध्ये लोकमतच्या प्रतिनिधीने फेरफटका मारून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तेव्हा या मॉल परिसराला कधीही सशस्त्र पोलीस भेट देत नाहीत किंवा तेथील सुरक्षा रक्षकांकडे शस्त्रे नाहीत. केवळ दंडुके व वॉकीटॉकी घेतलेले सुरक्षा रक्षक तेथे तैनात आहेत.
या दोन्ही मॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, बॅगा तपासणारी स्क्रीनिंग मशीन बसवली आहेत. मात्र अचानक एखाद्या वाहनातून एके-७४ घेतलेले अतिरेकी उतरले व त्यांनी मॉलमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली तर त्याचा मुकाबला करण्याकरिता बाहेरून पोलीस अथवा लष्करी कुमक येण्याची वाट पाहावी लागेल. मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी ट्रायडंट व ताज महाल हॉटेलात घुसलेल्या सशस्त्र अतिरेक्यांचा मुकाबला करण्याकरिता दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत कमांडो पथक येण्याची वाट पाहावी लागली होती. ठाण्यातील बड्या मॉलवर हल्ला झाला तर पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होईल. अर्थात तोपर्यंत अनेकांना प्राण गमवावा लागेल.
बहुतांश मॉलमध्ये सरकते जिने बसवले आहेत. समजा अतिरेकी हल्ल्याची केवळ अफवा जरी पसरली तरी पळ काढण्याकरिता होणाऱ्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. याबाबत पोलिसांना विचारले असता एखाद्या वेळी दहशतवादी हल्ला झाल्यास काय केले पाहिजे, याबाबतच्या अचूक प्रशिक्षण व त्याबाबतच्या सूचनाही प्रत्येक मॉल व्यवस्थापकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य हल्ल्याच्यावेळी बाहेरून येऊन प्रत्युत्तर देता येईल किंवा कसे, याचे तसेच केलेल्या सूचनांनुसार मॉलची सुरक्षा नेहमीच सज्ज आहे का? हे पाहण्यासाठी दर महिन्याला पोलिसांकडून मॉकड्रिलद्वारे केली जाते, असे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या विवीयाना मॉलच्या सुरक्षेच्या खबरदारीबाबत पडताळणी केली असता, मॉलमध्ये एखाद्या वेळेस दहशतवाद्यांनी मॉलमध्ये थैमान घातले तर त्यांना बाहेरून प्रत्युत्तर देता येईल. सांगितलेली खबरदारी घेण्यास मॉलची सुरक्षा नेहमीच सज्ज आहे का? हे पाहण्यासाठी दर महिन्याला पोलिसांकडून मॉकड्रिलद्वारे चाचणी घेतली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, तसेच आतामध्ये येणाऱ्यांचीही मेटल डिटेक्टर आणि सुरक्षारक्षकांकडून तपासणी होते. त्यातच खरेदीकरून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैईरसोय होऊ नये म्हणून रिक्षांची व्यवस्था केली आहे. तसेच मॉलच्या आवारात एखादे वाहन वेगाने जाऊ येऊ नये म्हणून गतीरोधक बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरम मॉलमध्येही तशीच खबरदारी घेतली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे नेहमीच सात लाख प्रवाशांनी गजबजलेले स्थानक म्हणून ओळखले जाते. सुरक्षेकरिता येथे बसवलेले मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर अक्षरश: अडगळीत पडले आहेत. तसेच स्थानकात प्रवेशासाठी २५ मार्ग असून त्यात चोरट्या मार्गांचाही समावेश आहे.
‘कोणीही यावे, टपली मारून जावे’ अशी अवस्था असलेल्या स्थानकात हाताच्या बोटावर मोजता येईल येवढ्याच आरपीएफ पोलिसांचा वावर असल्याचे दिसते. या स्थानकात तब्बल दहा फलाट आहेत.
यामधील एक आणि दहावर प्रामुख्याने गर्दुल्यांचा वावर दिसून येतो. येथील सुरक्षा रामभरोसेच आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यासारखी घटना घडली तर काय घडेल याची कल्पनाही करवत नाही.
दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्षावधी डोंबिवलीकर फडके रोडवर येतात. गुढीपाडव्याला वाजतगाजत शोभायात्रा निघतात. याखेरीज दररोज रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात सकाळी व सायंकाळी लक्षावधी लोकांची गर्दी बाजारहाट करण्याकरिता उसळलेली असते. त्यांच्या सुरक्षेकरिता सशस्त्र पोलीस तर दूरच राहिले परंतु काही दिवसांपूर्वी बसलेले ८० सीसीटीव्ही कॅमेरेही सध्या काम करीत नाहीत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल व त्याला जोडून उभारण्यात आलेला स्कायवॉक यावर प्रचंड गर्दी असते. अशावेळी प्रत्यक्ष अतिरेकी हल्ला सोडा केवळ तशी अफवा उठली तरीही चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचा बळी जाईल इतकी दारूण स्थिती आहे.
शहरातील वाढती चेनस्रॅचिंग, भुरट्या चोऱ्या, महिलांवरील अत्याचार यांसह अन्य अप्रिय घटनांना चाप बसण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी लोकसहभागातून शहराच्या सुरक्षेसाठी तब्बल ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते वाजतगाजत याचे उदघाटन झाले मात्र, प्रारंभापासून त्याचा वापर न झाल्याने ते सध्या निकामी झाले आहेत. परिणामी सुमारे १० लाख डोंबिवली-ठाकुर्लीकरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट होत आहे.
कॅमेरांचा वापर करावा यासाठी चव्हाण यांच्यासह अनेक दक्ष नागरिकांनी सातत्याने पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार केला, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे सांगण्यात आले. यावरून सरकारने महापालिका निवडणुकीच्यावेळी जाहीर केलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजमधील कामांच्या देखभालीचे काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.
अतिरेक्यांचे ठाणे,
नवी मुंबई कनेक्शन
पॅरीससह मालीतील हल्लयाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणेसह राज्यातील नागरी सुरक्षेसह सागर किनाऱ्यांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. कारण देशात कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यात आता १२० किमीच्या सागर किनाऱ्यासह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिंवडी,मीरा-भार्इंदर आणि पालघर जिल्ह्याचा येनकेन संबंध आलेला आहे. जिल्ह्यातील वाढती लोकसंख्येसह आयटीपार्कच्या जाळ्यामुळे नवी मुंबईसह ठाणे जिल्हा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनू पाहत आहेत. या दोन्ही जिल्ह्यात सात महापालिका, पाच नगरपालिका आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासह ठाणे आणि नवी मुंबई ही दोन अतिमहत्त्वाची पोलीस आयुक्तालये आहेत. जितक्या गतीने जिल्ह्यात नागरिकीकरण होत आहे, तितक्याच किंबहुना त्याहून अधिक वेगाने येथील नागरी समस्यांसह सुरक्षेचे प्रश्न वाढत आहेत. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फ ोटांमागचे मुंब्रा कनेक्शन असो, संसदेवरील हल्ला, आर्मी आणि आॅईल सेंटरमध्ये आपले जाळे अधिक घट्ट करण्याचे काम करणारे तलासरीतून एटीएसने पकडलेले लष्कर-ए-तोयबाचे दोन हस्तक किंवा काल-परवा वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फ ोटांची माहिती देणाऱ्या ई-मेलसाठी नवी मुंबईतून गेलेला ई-मेल. मुंबईवरील २६/११ चा हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी डहाणू मार्गे केलेला प्रवेश. या साऱ्या गोष्टी देशातील दहशतवाद्यांचे पालघर, ठाणे व नवी मुंबईचे कनेक्शन सांगणाऱ्या आहेत. दहशतवाद्यांचे जिल्ह्यात असलेले जाळे सर्वप्रथम १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर उघडकीस आले. या ठिकाणी वापरलेल्या आरडीएक्सपैकी सुमारे २८३० किलो आरडीएक्स मुंब्य्रात सापडले होते. त्यानंतर संसदेवरील हल्ल्याच्या कटातील आरोपी अबू हमजा ठाण्यातूनच पकडला गेला. १६ मार्च २००२ रोजी हिजबुलच्या दोन अतिरेक्यांना मुंब्य्रातून अटक केली होती. घाटकोपर, मुलुंड येथील लोकलसह अहमदाबाद, जयपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ठाण्यातील नागला बंदर, भिवंडीनजीकच्या बोरोली गावातून पोलिसांनी हत्यारे आणि अतिरेक्यांशी संगनमत करणाऱ्या साथीदारास पकडले होते.
अक्षरधाम आणि संसदेवर हल्ला झाला तेव्हा नवी मुंंबईतील टीएस चाणक्य, एनआरआय वसाहतींचा बंदोबस्त वाढविला होता. पाम बीच मार्गावर हवाई दलाचे रडार त्यासाठी तैनात केले होते. गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान यांच्या हत्येच्या कथीत कटात सहभागी असलेली संशयित इशरत जहाँ मुंब्रा येथील रहिवासी होती. जंगली पठाण या पाक नागरिकाला ठाण्यातून अटक झाली होती. मागे २००९ मध्ये नवी मुंबईतील घणसोलीतून मुमताज चौधरीसह कळंबोली आणि कोपरखैरणेतून अतिरेक्यांना अटक झाली होती. २६/११ च्या हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार डहाणूमार्गेच मुंबईत आले होते. तेव्हा मुंबई एटीएसने रझाक आणि रशीद या दोघा लष्करच्या हस्तकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात अन् राजस्थानमधील आर्मीचे तळ आणि आॅईल कंपन्यांत आपल्या पंटरांचे जाळे विणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे कमी म्हणून की काय, त्या काळात वाराणसीत झालेल्या बॉम्बस्फ ोटाची जबाबदारी स्वीकारणारे इंडियन मुजाहिद्दीनचे ई-मेल नवी मुंबईतून गेले आहेत. यावरून राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत पालघर, ठाणे जिल्हा किती ऐरणीवर आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात एवढी प्रचंड गर्दी असतानाही कधीही तेथे पोलिसांची गस्त असल्याचे दिसत नाही. रात्रीच्यावेळी पोलिसांची गाडी राऊंड लावते पण ती उशिरापर्यंत स्टेशन परिसरात सुरु असलेले बार बंद व्हावेत व वडापावच्या गाड्यांनी आपला धंदा बंद करावा याकरिता.
पोलिसांची गाडी दिसताच बारवाले शटर डाऊन करतात आणि गाडीवाले दिवे बंद करतात. पोलिसांची गाडी पुढे गेल्यावर पुन्हा सारे सुरु होते. मात्र दिवसभरात या गजबजीच्या शहरात कुठलीच खबरदारी घेतली जात नाही.
गर्दीमुळे लोकांचे होणारे वाद, रिक्षावाले व प्रवासी यांचे हातघाईवर येणे किंवा फेरीवाले व पादचारी यांच्यातील संघर्ष या कुठल्याही वेळी पोलीस मध्यस्थीला येत नाही. अन्य लोक मध्ये पडतात आणि हातघाईवर प्रकरण जाणार नाही याची काळजी घेतात.
त्यामुळे खरोखरच अतिरेकी हल्ला झाला तर पोलीस यंत्रणा त्याचा मुकाबला करायला किती वेळात सज्ज होईल याबाबत सामान्य डोंबिवलीकरांना भीती वाटते. सीसीटीव्ही कॅमेरे बंद, पोलीस चौकी नाही अशावेळी केवळ एक-दोन बीट मार्शलवर लक्षावधी डोंबिवलीकरांची मदार असते.
तीन लाख प्रवाशांकरिता डझनभर पोलीस
मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातून दररोज तीन लाख प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी एका शिफ्टमध्ये केवळ दोन पोलीस तैनात असतात. या दोन्ही स्थानकांत मिळून जेमतेम डझनभर पोलीस आहेत.
भार्इंदर रेल्वे स्थानकातून दररोज एक लाख ६३ हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु येथे सुरक्षा बलाचे एका पाळीत दोन प्रमाणे केवळ ६ तर एका पाळीत अवघे एक किंवा दोन पोलिस व तेवढेच होमगार्ड असतात. येथील ६ फलाट आणि ३ प्रवासी पूल यावर ४८ सीसीटीव्ही बसवले आहेत. मीरारोड रेल्वे स्थानकातून रोज एक लाख १७ हजार प्रवासी प्रवास करतात. येथे तर एका पाळीत केवळ १ पोलिस व १ होमगार्ड असतो. सुरक्षा बलाचे एका पाळीत दोन प्रमाणे ६ जवान आहेत. स्कायवॉकसह अन्य ३ प्रवासी पादचारी पूल व ४ फलाट आहेत. तेथे सीसीटीव्ही मात्र २८ च आहेत. मीरा रोड व भार्इंदर या स्थानकातील प्रवेश मार्गीकेवर मेटल डिटेक्टर बसवलेले नाहीत. तपासणीसाठी एकही पोलीस वा रेल्वे सुरक्षा दलाचा जवान दिसत नाही. एका खाजगी विकासकाने पोलिसांना बसण्यासाठी दोन्ही स्थानकात आपल्या जाहिरातीसह बाकडे उपलब्ध करुन दिले परंतु तेथे पोलिसांऐवजी गर्दुल्ले, फेरीवाले, भिकारी बसलेले असतात. फलाटावर येण्यासाठीचे चोर मार्ग बंद झालेले नाहीत.
धमकी मिळाली तरीही प्राचीन शिवमंदिराची सुरक्षा वाऱ्यावर
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे येथील लोकांचे श्रद्धास्थान असल्याने तेथे सतत गर्दी असते. मात्र तेथील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचेच दिसते. अंबरनाथकरांचे वैभव असलेले हे मंदिर उडविण्याची धमकी यापूर्वी देण्यात आली होती. धमकी आल्यावर मंदिराला चोख बंदोबस्त मिळला होता. मात्र इतरवेळी या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावरच असते. सध्य स्थितीत या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. मात्र मुख्य प्रवेशद्वारासोबत मंदिराच्या परिसरात येण्यासाठी इतर अनेक मार्ग असल्याने या मंदिरात कोणीही कधीही येऊ शकतात
अंबरनाथ पालिकेपेक्षाही बिकट परिस्थिती ही अंबरनाथ तहसिलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवनाची आहे. या चार मजली कार्यालयासाठी एकही सुरक्षा रक्षक नाही. मुख्य प्रवेशद्वारे ही २४ तास उघडी असतात. तहसिलदार कार्यालयाच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा रात्रीच्या वेळीसही वावर असतो. बदलापूर पालिकेतही अशीच परिस्थिती आहे. येथील सुरक्षा ही सुरक्षा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या आवारातच मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या करण्यात येतात. बाहेरील व्यक्ती थेट पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आपली गाडी उभी करून निघून जाते. त्यामुळे येथे कोणताही घातपात घडण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात सुरक्षा अपुरीच
ठाणे महापालिका मुख्यालय, १० प्रभाग समित्या, रुग्णालये, २५ आरोग्य केंद्रे, महत्वाची उद्याने, नाट्यगृह आदींसह पालिकेच्या इतर कार्यालयांत सुरक्षेची जबाबदारी ही केवळ ४९४ सुरक्षा रक्षकांवर अवंलून आहे. मुख्यालयाचाच विचार केला तर आज या मुख्यालयाला चार प्रवेशद्वार आहेत. यामध्ये गेट नंबर एक मधून बँकेचे कर्मचारी आणि पत्रकार, दोन नंबरमधून व्हीआयपी आणि नगरसेवक, तीन नंबर मधून नागरीक आणि चार नंबरमधून कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. येणाऱ्या नागरीकांना कोणत्या विभागात जायचे आहे, त्यांचे नाव, कामाचे स्वरुप आदी माहिती प्रवेशद्वारावर घेतली जात आहे. ठाणे महापालिका मुख्यालय हे यापूर्वीच अतिरेक्यांच्या रडावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु तरीही हवी त्या प्रमाणात येथील सुरक्षा यंत्रणा, आजही सक्षम नसल्याचे दिसत आहे. मुख्यालयाच्या चार मजल्यांवर ३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच आयुक्त कार्यालय, अतिरिक्त आयुक्त एक येथेही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
तर अतिरिक्त आयुक्त २ आणि नागरी सुविधा केंद्रातही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. पाच बंदुकधारी, ८ महिला सुरक्षा रक्षक आणि प्रत्येक गेटवर तीन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, २० मेटल डिटेक्टर आहेत. त्यातील पाच मेटल डिटेक्टर हे मुख्यालयात बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांचे कामही रामभरोसे असेच सुरु आहे. दरम्यान, शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिकेत वाढणाऱ्या कामांच्या व्याप्ती लक्षात घेऊन पालिकेला आजही ३०० हून अधिक सुरक्षा रक्षकांची गरज आहे.
विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांची भरती करण्यासाठी पालिकेने अडीच वर्षापूर्वी भरती प्रक्रिया सुरु केली होती. परंतु, आजही ही रखडलेली आहे. सुरक्षा रक्षकांना सध्या तीन, तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. या संदर्भात काही सुरक्षा रक्षकांनी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु जो पर्यंत भरती होत नाही, तो पर्यंत कर्मचाऱ्यांना अशा पध्दतीनेच काम करावे लागणार असल्याची भुमिका, पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सीसीटीव्हीच गेले चोरीला, आता बोला
रेल्वे स्थानकाबाहेर स्कायवॉकच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक शाखेने पुढाकार घेऊन १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. आजच्या घडीला यातील बहुतांश कॅमेरे चोरीला गेले आहेत किंवा देखभालीअभावी बंद आहेत. कॅमेरे बंद झाल्यापासून या परिसरातील वाहन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. याच कल्याणमधील चार तरुण इसिसला जाऊन मिळाल्याची वृत्ते वर्षभरापूर्वी देशभर गाजली होती त्या शहरातील सुरक्षा व्यवस्थेची अब्रु भुरटे चोर लुटत आहेत.
कल्याण हे जंक्शन आहे. येथे दिवसरात्र बाहेर गावाहून गाड्या येतात. साडेसहा लाख प्रवासी ये-जा करतात. अनेकदा अवजड सामान घेतलेले प्रवासी आपल्या गाडीची वाट पाहत रेल्वे स्थानकातच झोपलेले असतात. त्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था शून्य आहे. रेल्वे स्थानकात बसवलेले मेटल डिटेक्टर बंद आहेत. सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. अस्ताव्यस्त पसरलेल्या कल्याण स्थानकात भिकारी, गर्दुल्ले याचा संचार असतो. मुजोर रिक्षा चालक प्रवाशांची लूट करीत असतात आणि पोलिसांचा कुठेच थांगपत्ता नाही. कल्याण रेल्वे स्थानकासमोरच एस.टी.चे स्थानक आहे. तेथेही कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे फ्रान्स अथवा मुंबईसारखा अतिरेकी हल्ला झाला तर त्याचे परिणाम कितीतरी पट भीषण असतील. मुंबईवर प्रारंभी जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी याच स्थानकातील रेल्वेच्या डब्यात भीषण स्फोट होऊन काहींना प्राण गमवावे लागले होते. कदाचित आज ही घटना दीर्घकाळ लोटल्याने विस्मृतीत गेली असेल परंतु अतिरेकी कारवाया आणि कल्याण याचा जुना संबंध आहे हे विसरता येत नाही. कल्याण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी अनेक महत्वाची सरकारी कार्यालये आहेत. पॅरीस दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षेचा आढावा घेतला असता तेथे आओ-जाओ घर तुम्हारा अशीच स्थिती आहे.
एका हत्येच्या गुन्हयातील आरोपीची गाडी काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारातून पोलिसांनी हस्तगत केली होती. तसेच महासभेच्या सभागृहातील प्रेक्षक गॅलरीत पिस्तूलाच्या काडतुसाची पुंगळीदेखील काही वर्षांपूर्वी आढळली होती. केडीएमसी मुख्यालयातील सुरक्षेचा हा इतिहास असतानाही अजूनही त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही.
मुख्यालयातील जवळपास सर्वच मेटल डिटेक्टर नादुरूस्त आहेत. मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद करणे, तपासणी करणे हे चित्र एखादी घटना घडल्यावर दोन दिवसांकरिता असते. विशेष बाब म्हणजे येथील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींकडून मारहाणीचे प्रकार घडले आहेत.
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था तर याहून खराब आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरील नागरीक आपली वाहने तेथे बिनदिक्कत पार्क करतात. सुरक्षा रक्षकांची २६९ पदे मंजूर आहेत. यापैकी बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षा पुरविताना संबंधित विभागाची पुरती दमछाक होताना दिसते. त्यातच महापालिका अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांना सुरक्षा पुरवावी लागते.
पुरेशा संख्याबळाअभावी शहरातील दोन नाटयगृहे, रूग्णालये आणि महापालिकेच्या इतर कार्यालयांची सुरक्षाही धोक्यात असल्याचे चित्र आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल एकंदरीतच परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे.