टाटाच्या दरवाढीच्या प्रस्तावात ६% कपात
By Admin | Updated: April 14, 2015 02:24 IST2015-04-14T02:24:21+5:302015-04-14T02:24:21+5:30
टाटा पॉवरने मुंबईकर वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज दरवाढ प्रस्तावात ६ टक्के दरकपात केली आहे. तर दुसरीकडे रिलायन्सने १८ ते २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे.
टाटाच्या दरवाढीच्या प्रस्तावात ६% कपात
मुंबई : रिलायन्स, महावितरण आणि बेस्टने वीजदरवाढीसाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच टाटा पॉवरने मुंबईकर वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज दरवाढ प्रस्तावात ६ टक्के दरकपात केली आहे. तर दुसरीकडे रिलायन्सने १८ ते २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे.
मुंबईचा अखंड वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी टाटा पॉवरने पारेषण वाहिनी क्रमांक ३मध्ये सुधारणा करण्यासाठी कळवा रिसिव्हिंग स्टेशन ते टाटा पॉवर सालसेत रिसिव्हिंग स्टेशन मार्गावर नवीन पारेषण वाहिनी टाकली आहे. नव्या वाहिनीमुळे जुने कंडक्टर बदलून उच्च क्षमतेचे कंडक्टर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याची क्षमता ९०० अॅम्पियरवरून १८०० अॅम्पियर एवढी झाली आहे. नव्याने टाकलेल्या २२० केव्हीच्या वाहिनीमुळे कळवा-सालसेत वाहिनीवर अतिरिक्त भार कमी होईल आणि मुंबई शहरासाठी बाहेरून वीज वाहून आणण्यास मदत होईल, असा दावा टाटा पॉवरने केला आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स आणि टाटाने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच या दरवाढीवर निर्णय घेण्यात येणार आहे. आयोगाने निर्णय घेतल्यानंतर १ एप्रिलपासून नवे विजेचे दर लागू केले जाणार असून, ते पुढील वीज बिलात वर्ग करण्यात येणार आहेत. रिलायन्सने १८ ते २० टक्के दरवाढ मागितली असून, टाटांचा ६ टक्के दरकपातीचा प्रस्ताव आहे.
वेगवान कामे
मुंबई शहराची विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच येथील वीजनिर्मिती कमी झाल्यास कळवा-सालसेत दरम्यानच्या २२० केव्ही वाहिनीवरील भार अनेकदा वाढत होता. हा भार कमी करण्यासाठी कळवा आणि सालसेतदरम्यान, पारेषण क्षमता वाढविण्यासाठी टाटाने महाराष्ट्र स्टेट रोड डिस्पॅच सेंटर आणि स्टेट ट्रान्समशीन युटीलिटी यांच्यासमोर प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, कळवा-सालसेत वाहिनी क्रमांक ३ बदलण्यात आली असून, वाहिनी क्रमांक ४चे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
टाटाचे ३०० युनिटपर्यंतचे वीजदर रिलायन्सच्या तुलनेत कमी आहेत. परिणामी, रिलायन्सचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे वळत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस टाटाच्या ग्राहक संख्येत २० टक्क्यांची भर पडली आहे. ही ग्राहकसंख्या
६ लाखांवर पोहोचली आहे. त्यापैकी ५ लाख ३८ हजार ग्राहकांना रिलायन्सच्या नेटवर्कहून वीजपुरवठा केला जात आहे.
३०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ८७ % म्हणजे ५ लाख ६ हजार आहे.
मुंबईवरील वीजसंकट कमी होणार
पारेषण यंत्रणा ही वीजनिर्मिती केंद्र व वितरण कंपन्या यामध्ये वीज वाहून नेण्यासाठी उपयोगी असते; आणि आता कार्यान्वित होणाऱ्या पारेषण वाहिन्या मुंबईला बाहेरून वीज आणण्यासाठी मदत करणार असून, भविष्यात मुंबईकरांना वीज संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
- अशोक सेठी,
कार्यकारी संचालक, टाटा पॉवर