घुमान महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी
By Admin | Updated: March 5, 2015 00:57 IST2015-03-05T00:57:08+5:302015-03-05T00:57:08+5:30
वारी’ ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी जसे दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जातात, तसेच वर्षातून एकदा सर्वांनी घुमानला जावे.

घुमान महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी
पुणे : ‘वारी’ ही महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी जसे दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जातात, तसेच वर्षातून एकदा सर्वांनी घुमानला जावे. घुमान ही महाराष्ट्राची ‘पंढरी’ व्हावी, अशी अपेक्षा ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली.
पंजाबच्या घुमान येथील साहित्य संमेलनानिामित्त प्रकाश पायगुडे यांनी लिहिलेल्या ‘साहित्यवारी घुमानद्वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार चरणजित सप्रा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. मोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे आयोजक, सरहद्द संस्थेचे संजय नहार, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, संतसिंग मोखा, नांदेडच्या नानकसाई फाउंडेशनचे पंढरीनाथ बोकारे, जगदीश कदम, संगत प्रकाशनचे जयप्रकाश सुरनूर आणि लेखक प्रकाश पायगुडे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भूमीला जसा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याचप्रमाणे पंजाबला गुरू गोविंदसिंग यांचा इतिहास आहे. संत नामदेव यांनी घुमानला येऊन कार्य केले. त्याचप्रमाणे गुरू गोविंदसिंग यांनी नांदेड येथे जाऊन कार्य केले. दोन्ही संतांच्या दूरदृष्टीमधून दोन राज्यांमध्ये नाते निर्माण होण्याची ही नांदी होती, असे चरणजित सप्रा म्हणाले.