काळाचौकीत चार मित्रांचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: June 21, 2015 02:16 IST2015-06-21T02:16:10+5:302015-06-21T02:16:10+5:30
आठवडाभरात एकामागोमाग एक चार मित्रांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काळाचौकी येथे घडली. यामध्ये दोघांचा अपघाती मृत्यू झाला असून, दोघांनी गळफास

काळाचौकीत चार मित्रांचा संशयास्पद मृत्यू
मृत्यूपूर्वी मोबाइल डाटा डिलीट ?
मुंबई : आठवडाभरात एकामागोमाग एक चार मित्रांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काळाचौकी येथे घडली. यामध्ये दोघांचा अपघाती मृत्यू झाला असून, दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी चौघांनीही मोबाइलमधील डाटा (माहिती) डिलीट केल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दर्शन काटकर (२०), चैतन्य परब (२०), प्रसाद धावडे (२१) आणि प्रतीक तेजम (२७) अशी या चौघांची नावे आहेत.
काटकर हा काळाचौकी येथील सीता सदनमध्ये राहत होता. तो कला शाखेच्या शेवटच्या वर्षाला होता. शिक्षणाबरोबरच तो जवळच्या खासगी ठिकाणी कामाला होता. ३१ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊनआत्महत्या केली. घटनेच्या आदल्या दिवशी तो दिवसभर कामावर होता आणि दोन मित्रांची बर्थडे पार्टी संपवून रात्री दीडच्या सुमारास घरी परतला होता. त्यामुळे घरचे त्याला ओरडले होते.
काटकरच्या आत्महत्येची घटना उघडकीस येत नाही तोच तासाभराने शिर्डीला जाण्यासाठी सात ते आठ मित्रांसोबत घराबाहेर
पडलेल्या चैतन्य आणि प्रसाद या दोघांच्या अपघाती निधनाची बातमी समोर आली. सकाळी पावणेआठच्या सुमारास बाईकवरून जात असताना दोघांचा ट्रकच्या धडकेत वापी जंक्शन येथे अपघात झाला.
काळाचौकी परिसरात राहणारा चैतन्य हा फोटोग्राफीचे शिक्षण घेत होता, तर शिवडी येथील रहिवासी असलेला प्रसाद महात्मा फुले विद्यालयात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. याप्रकरणी वापी पोलिसांनी कृष्णकांत निशाद या ट्रकचालकाला अटक केली होती.
या घटनेला आठवडा उलटत नाही तोच काळाचौकी येथील बबन चाळीमध्ये राहणारा प्रतीक (२७) या मित्राने ७ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. प्रतीक कॅटरिंगचा व्यवसाय करीत होता. चारही जणांनी मृत्यूपूर्वी आपल्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्ड, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप डाटासहित फेसबुकवरील फोटो डिलीट केल्याचे तपासात समोर आले आहे. हे चारही तरुण एकमेकांचे जीवलग मित्र होते. चारही तरुणांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली. मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोघांचा अपघाती तर दोघांचा आत्महत्या करून मृत्यू झाला आहे. अपघाताबाबत नाशिक पोलिसांच्या मदतीने सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली याचा अधिक तपास सुरू असून, चारही मित्रांचा डिलीट केलेला मोबाइल डाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ती भेट अखेरची...
आत्महत्येच्या आदल्या दिवशी आमची भेट झाली. नेहमीप्रमाणे गप्पा मारून रविवारी मित्रांसोबत शूटला जाण्याचा प्लॅनही आखला. असे असताना ती भेट अखेरची ठरेल हे वाटले नव्हते, असे दर्शनची मैत्रीण ऋतुजा भोसले हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
व्हॉट्सअॅपवरून दिला आयुष्याला पूर्णविराम
आत्महत्येच्या घटनेआधी तासाभरापूर्वी प्रतीकने त्याचा व्हॉट्सअॅप फोटो अपलोड करून स्टेटसला पूर्णविरामचे चिन्ह ठेवले होते. तो पूर्णविराम त्याच्या आयुष्याचाच शेवट असेल असे स्वप्नात सुद्धा वाटले नसल्याचे त्याचा भाऊ प्रणीत याने सांगितले.