सूर्यानदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला
By Admin | Updated: June 2, 2015 22:49 IST2015-06-02T22:49:54+5:302015-06-02T22:49:54+5:30
पालघर-मनोर रस्त्यावरील सूर्यानदीवर २२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला पूल मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

सूर्यानदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला
पालघर : पालघर-मनोर रस्त्यावरील सूर्यानदीवर २२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला पूल मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पालघरवरून मनोरमार्गे गुजरात, मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, कोल्हापूर आदी लांबपल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ३० वर्षापूर्वी मासवण जवळील सूर्या नदीवर पुल बांधण्यात आला होता. या पुलाच्या दोन्ही कडेला बंधारा बांधण्यात आल्यानंतर पावसाळ्यात नदीला पूर येऊन वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांचा संपर्क तुटत होता. या अडचणीवर मात करण्यासाठी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. आर. बालू व के. मुनीयप्पा यांच्याकडे पाठपुरावा करून सात कोटी दहा लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळविली होती. २८ आॅगस्ट २००८ रोजी मान्यता मिळाल्यानंतर सन २०१० पासून कामाला सुरूवात करण्यात आली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात उद्घाटन व श्रेय घेण्याच्या वादावरून अनेक वेळा या कामामध्ये व्यत्यय आले. त्यामुळे बांधकाम रखडले होते.
या पुलाची लांबी १५४.५० मिटर असून त्यासाठी १० कोटी ५६ लाख खर्च करण्यात आले.पुलाला जोडण्यात आलेला पालघर बाजूच्या ३०० मीटर रस्त्याला ३ कोटी ७४ लाख तर मनोर बाजुच्या ६०० मीटर रस्त्यासाठी ७ कोटी ८२ लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र येथे असलेल्या वीज डीपीमुळे अडथळा निर्माण झाला. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी या एमएसईबीच्या वेळकाढू धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ठेकेदार दिलेश संखे, कल्पेश संखे यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करून युद्धपातळीवर काम सुरू केल्यानंतर मंगळवारी दुपारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.