Join us  

Constitution Day: “मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल”: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:12 PM

संविधानाने सामान्यांना दिलेल्या ताकदीमुळे शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मुंबई: दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन (constitution day) साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्र सरकारने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, मोदी सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार संविधान बदलू पाहत असून, भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना केले. 

संविधान जात, धर्म किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातील सत्ताधारी हे संविधान बदलू पाहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आपली जी काही ओळख आहे, ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा. संविधान वाचलं तरच देश वाचेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

संविधानाच्या संरक्षणासाठी उभे राहिले पाहिजे

संविधानाच्या संरक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे. अगदी मोठे आंदोलन जरी प्रत्येकाला शक्य झाले नाही, तरी आपल्या पातळीवर आपण छोट्या छोट्या गोष्टी करून संविधानाबद्दलच्या जाणिवांबाबत जागर करू शकतो. पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील, याची काळजी आपणच घ्यायला हवी. संविधानाच्या बळकटीसाठीच आपण आपली संघटना वाढवत राहूया आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राहूया, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना केले.

संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचाय

या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचा आहे. या संविधानाने ही ताकद आपल्याला दिली म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

दरम्यान, भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालावा, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते, ते महत्त्वाचे आहेत. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. गेल्या काही वर्षांपासून दरररोज पायाखाली तुडवला जात असून, अवहेलना केली जात आहे. त्यामुळे सरकारने संविधान दिवस पाळण्याचे जे ठरवले आहे, त्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेला शिवसेनेचे समर्थन आहे. आम्हीदेखील सहभागी होणार नाही. राज्यघटनेतील अनेक कलमे, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचे नाटक कशासाठी, असा सवाल करत  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संविधान दिनसुप्रिया सुळे