सूर्या प्रकल्पग्रस्त मोबदल्याच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 26, 2014 01:31 IST2014-08-26T01:31:50+5:302014-08-26T01:31:50+5:30
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डहाणू, पालघर, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील शेतक-यांसाठी १९७८ साली कासा भागातील धामणी येथे सूर्या नदीवर सूर्या प्रकल्प उभारण्यात आला

सूर्या प्रकल्पग्रस्त मोबदल्याच्या प्रतीक्षेत
शशिकांत ठाकूर, कासा
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डहाणू, पालघर, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील शेतक-यांसाठी १९७८ साली कासा भागातील धामणी येथे सूर्या नदीवर सूर्या प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जलसंपदा विभागाने संपादित केल्या. ३४ वर्षे या प्रकल्पाला पूर्ण होत असली तरीही अनेक शेतकरी व प्रकल्पग्रस्त मोबदल्याच्या आजही प्रतीक्षेतच आहेत.
सुरूवातीला जमिनीचे भाडे पाच ते सहा वर्षे देण्यात आले. त्यानंतर या जमिनीचे मोजमाप करून दहा वर्षापूर्वी काहींना मोबदला दिला, परंतु बऱ्हाणपुर, सोमटा, आंबेदा, नानीवली, आकेगव्हाण, आकोली, चिंचारे, किराट, रावते, घोळ, भराड येथील शेतकऱ्यांना मोबदला अथवा भूभाडेही मिळालेले नाही. वारंवार तगादा लावूनही त्यांना अधिकारी दाद देत नाहीत. सिंचन हा प्रमुख उद्देश असलेल्या धरणाच्या पाण्याखाली १४ हजार ६९६ हेक्टर जमिनी सिंचनाखाली आणण्यात आली.
या धरणासाठी विक्रमगड तालुक्यातील सावा, तिलोंडा, चांभारशेत, तलावली, तलवाडा व डहाणूतील धरमपूर, कोसेशरी अशा सात गावातील जवळपास ४५० कुटुंबे विस्थापित करून त्यांचे पुनर्वसन डहाणू तालुक्यातील हनुमान नगर व चंद्रनगर येथे करण्यात आले, मात्र त्यांनाही पुरेशा नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.
३४ वर्षापासून हे शेतकरी वारंवार अर्ज, विनंत्या सूर्या प्रकल्प कार्यालयाकडे करत असूनही त्यांच्या नशिबी अद्यापही निराशाच आहे. त्यांच्या प्रश्नाला दाद मिळत नाही. दरम्यान, १० वर्षापूर्वी या सूर्या प्रकल्पाची सर्व कार्यालये बंद करून हा प्रकल्प भातसा कालवा क्र. १ शहापुरला जोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १०० ते १५० कि. मी. अंतरावर वारंवार जाणे शक्य होत नाही, असे आंबेदा येथील महेंद्र पावडे यांनी सांगितले.