भररस्त्यात एसटी बंद!

By Admin | Updated: June 23, 2014 02:47 IST2014-06-23T02:47:56+5:302014-06-23T02:47:56+5:30

आगारातून निघालेली गाडी इच्छित स्थळी वेळेत आणि न रखडता पोहोचेलच याची सध्या काहीच शाश्वती नाही

Storm ST is closed! | भररस्त्यात एसटी बंद!

भररस्त्यात एसटी बंद!

दीपक गायकवाड, मोखाडा
आगारातून निघालेली गाडी इच्छित स्थळी वेळेत आणि न रखडता पोहोचेलच याची सध्या काहीच शाश्वती नाही. जव्हार आगाराकडील टाटा कंपनीच्या एसटी बसेस या मार्गावरच २/२ दिवस दुरूस्तीच्या प्रतिक्षेत पडून राहत आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत प्रवाशांकडून प्रत्यक्ष ओरड होऊनही आगार व्यवस्थापन कोणतीही दखल घेत नसल्याने अतिदुर्गम भागातील प्रवासी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
जव्हार आगाराकडे असलेल्या टाटा कंपनीच्या एकूण १२ एसटी बस गाड्या या सतत कोणत्या ना कोणत्या मार्गावर बिघडलेल्या असतात. अशा परिस्थितीत आदिवासी प्रवाशांना सामान डोक्यावर घेवून प्रवास करावा लागतो. पावसाळी हंगाम असल्याने शेतकरी आणि शेतमजूरही पावसाळ्यासाठी चार महिन्यांच्या वाणसामानांची, कांदेबटाट्याची बेगमी करीत असतात व असे सर्व जड सामान डोक्यावर वाहून नेण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संतापाचे वातावरण आहे.
काल शुक्रवारी दिवस अखेर एकाच दिवसात खोडाळा विभागातून अतिदुर्गम भागात मार्गक्रमण करणाऱ्या दोन बसेस बिघडल्या, त्यांना दुरूस्तीसाठी वेळेवर स्पेअरपार्टही उपलब्ध न झाल्याने या दोन्हीही बसेस रस्त्यातच पडून होत्या. याबाबत विचारणा केली असता टाटा कंपनीचे पार्ट वेळेवर उपलब्ध होत नाहीत व अत्यावश्यक पार्ट जव्हार आगाराकडे नसल्याने पालघर विभागाकडे मागणी करावी लागते. तिकडून पुरवठा झाल्यानंतरच नादुरूस्त बस दुरूस्त करण्याची प्रक्रिया सुरू होते. यात बराच वेळ जातो. त्यामुळे टाटा ला आता बाय-बाय करण्याची वेळ आली आहे असे दस्तुरखुद्द जव्हार आगाराच्या देखभाल दुरूस्ती विभागाचे मत आहे.
दरम्यान, टाटा कंपनीच्या सातत्याने बिघडणाऱ्या बसेस या अतिदुर्गम भागात न पाठवण्याची भूमिका प्रवाशांनी घेतली असून त्यावर कार्यवाही न झाल्यास आम्हाला रास्तारोको करावा लागेल असे प्रवासी संघटनांनी सांगितले.

Web Title: Storm ST is closed!