Join us  

राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 6:50 PM

राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे

मुंबई - महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गड-दुर्ग किल्ल्यांनी समृद्ध असे राज्य आहे. महाराष्ट्रात ३५० हून अधिक किल्ले आहेत. या किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे ८ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत सोशल माध्यमावर गड - दुर्ग किल्ल्यांवर आधारीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. यामध्ये व्हिडिओग्राफी व छायाचित्रण स्पर्धा असेल. 

राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड - दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागत यांना या गड-दूर्ग किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करुन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धेमुळे इच्छुक व तरुणांमध्ये आवड निर्माण होईल आणि त्यांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड - दूर्ग किल्ल्यांना भेट देण्यास प्रोत्साहीत केले जाईल. पर्यटकांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गतवैभव अनुभवता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

कशी असणार ही स्पर्धा? 

  • स्पर्धा ही व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची आहे. स्पर्धा खुली श्रेणी व व्यावसायिक श्रेणी या दोन विभागात असेल.  ज्यांना छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफीमध्ये आवड आहे त्यांच्यासाठी खुली श्रेणी आहे. सर्व स्तरातील लोकांसाठी ही श्रेणी आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये  पारितोषिक राहील. 
  • स्पर्धेत दुसरी व्यावसायिक श्रेणी आहे.  छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीमधील तज्ञांसाठी ही श्रेणी आहे. यातील छायाचित्रण स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषिक राहील.
  • व्यावसायिक श्रेणीतील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये व तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये असेल. १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये पारितोषिक राहील. 

या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांविषयी जनजागृती वाढवणे आणि राज्यात देशी - विदेशी पर्यटकांची व अभ्यागतांची संख्या वाढविणे हा मुख्य हेतू आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

स्पर्धकांनी सोशल मिडियावर त्यांचे फोटो, व्हिडिओ हे #MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह पोस्ट करणे आवश्यक आहे. तसेच पर्यटन विभागाचे @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आलं आहे. 

टॅग्स :पर्यटनगडआदित्य ठाकरे