लोकल सुरू करा नाहीतर प्रत्येकाला पाच हजार प्रवास भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:08 IST2021-07-14T04:08:36+5:302021-07-14T04:08:36+5:30

मुंबई : लोकल सेवा बंद ठेवल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल बंद असल्याने प्रवास खर्च ...

Start a local or give five thousand travel allowance to everyone | लोकल सुरू करा नाहीतर प्रत्येकाला पाच हजार प्रवास भत्ता द्या

लोकल सुरू करा नाहीतर प्रत्येकाला पाच हजार प्रवास भत्ता द्या

मुंबई : लोकल सेवा बंद ठेवल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल बंद असल्याने प्रवास खर्च वाढला आहे. त्यामुळे एकतर राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासाला परवानगी द्यावी किंवा प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रूपये द्यावेत, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेले दीड वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे, अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरीय रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

Web Title: Start a local or give five thousand travel allowance to everyone