Join us  

'ST कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे स्पष्टपणे चहापाणी नाकारलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 4:38 PM

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते.

ठळक मुद्देदत्ता सामंतांच्या खुनानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा कष्टकऱ्यांसोबत उभा राहिला आहे. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंना मी सुचवायला आलोय, कारण जिवंतपणा हा तरुण आणि ताठर होत चालला आहे.

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज 15 वा दिवस आहे. त्यामुळे, आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब (Anil Parab ) यांनी भेट घेत संपावर चर्चा केली आहे. या संपावर तोडगा काढण्यासंदर्भात त्यांनी शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं. दुसरीकडे एसटी कामगारांच्या शिष्टमंडळानेही शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीवेळी कामगारांनी शरद पवारांचे चहा-पान नाकारल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.  

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, शरद पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळही भेटल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. आता, तरी सरकारने कामगारांचा आक्रोश जाणून घ्यावा, असेही सदावर्ते यांनी सूचवले आहे.

'दत्ता सामंतांच्या खुनानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा कष्टकऱ्यांसोबत उभा राहिला आहे. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंना मी सुचवायला आलोय, कारण जिवंतपणा हा तरुण आणि ताठर होत चालला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना हे सांगावं की, शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे चहा आणि पाणी स्पष्टपणे नाकारलं. यावरुन, आता महाराष्ट्र कशारितीने कामगारांच्या पाठिशी उभा राहतोय,' असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. 

राज ठाकरेंसोबत कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ पवारांच्या भेटीला

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं कालच 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेत त्यांना आत्महत्या थांबवण्याचं आवाहन केलं होतं. तुम्ही आत्महत्या थांबवल्या तरच मी सरकारशी बोलेन अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेपाच वाजता राज ठाकरे सिल्वरओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले . यावेळी एसटी कर्णचाऱ्यांचं शिष्टमंडळ देखील राज ठाकरे यांच्यासोबत आहे.  संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल

आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या शुक्रवारी निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :मुंबईशरद पवारएसटी संपजितेंद्र आव्हाड