सोसायट्यांची कचरा प्रक्रिया जागा चटई क्षेत्रातून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:53 IST2017-09-02T05:53:35+5:302017-09-02T05:53:42+5:30
ज्या हौसिंग सोसायट्या त्यांच्याकडील कचºयाची प्रक्रिया करुन विल्हेवाट लावतील आणि कचरामुक्त ठेवतील तेथे कचरा प्रक्रिया केली जाईल ती जागा त्यांच्या चटई क्षेत्रातून (एफएसआय) वगळण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सोसायट्यांची कचरा प्रक्रिया जागा चटई क्षेत्रातून वगळणार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्या हौसिंग सोसायट्या त्यांच्याकडील कचºयाची प्रक्रिया करुन विल्हेवाट लावतील आणि कचरामुक्त ठेवतील तेथे कचरा प्रक्रिया केली जाईल ती जागा त्यांच्या चटई क्षेत्रातून (एफएसआय) वगळण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया व साधनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते व स्वच्छता दूत अमिताभ बच्चन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, आयुक्त अजोय मेहता, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.
मुंबईतील सांडपाण्याचा एकही थेंब प्रक्रिया न करता समुद्रात जाऊ नये यासाठी येत्या दोन-तीन वर्षांत सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करुनच समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी यावेळी केली. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तीगतस्तरावर काम केले पाहिजे. स्वच्छता राखावी, कचरा कमी करावा, आपल्या घराप्रमाणेच शहरही स्वच्छ ठेवावे, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केले.