सोसायटी स्वत:च उचलणार कचरा
By Admin | Updated: September 2, 2015 01:46 IST2015-09-02T01:46:45+5:302015-09-02T01:46:45+5:30
अंबरनाथमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या मोठ्या गृहसंकुलांना स्वत:च्या संकुलातील कचरा संकलित करून तो पालिकेच्या प्रक्रिया केंद्रावर नेण्याची जबाबदारी स्वत:च स्वीकारावी लागणार आहे

सोसायटी स्वत:च उचलणार कचरा
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या मोठ्या गृहसंकुलांना स्वत:च्या संकुलातील कचरा संकलित करून तो पालिकेच्या प्रक्रिया केंद्रावर नेण्याची जबाबदारी स्वत:च स्वीकारावी लागणार आहे. त्या मोबदल्यात पालिका प्रशासन या गृहसंकुलांना सेवा शुल्कात सवलत देण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या प्रयत्नात आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलाविलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत कचरा संकलित करण्यासाठी गाड्या कमी पडत असल्याची तक्रार सर्वच नगरसेवकांनी केली. ती सोडविण्यासाठी काय करता येईल, याबाबत सूचना करण्यास नगरसेवकांना सांगण्यात आले. या वेळी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मोठ्या गृहसंकुलांना कचऱ्याचे संकलन करण्याची आणि तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पोहोचविण्याची जबाबदारी निश्चित करावी. नव्याने निर्माण होणाऱ्या मोठ्या गृहसंकुलांना परवानगी देताना ही अट नमूद करावी. त्यामुळे मोठ्या संकुलातील करचा योग्य प्रकारे संकलित केला जाईल. कचरा संकलित करण्याची आणि त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीवर राहिल्यास त्याचे नियंत्रण तिच चांगल्या पद्धतीने करू शकेल. सोसायटीने किंवा बांधकाम व्यवसायिकाने हे काम केल्याने त्यांना वार्षिक करातील सेवा शुल्कात सवलत देण्याची सूचना करण्यात आली. उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी या सूचनेचे स्वागत करून या संदर्भातील निर्णय पुढील सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)