Join us  

'... म्हणून उपोषण मागे घेतलं, मी 100 टक्के लोकांचं समाधान करु शकत नाही'

By महेश गलांडे | Published: January 30, 2021 1:49 PM

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही नेत्यांकडूनही अण्णांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली. भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता, अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील. 

अण्णा आणि फडणवीस भेटीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, अण्णांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सोशल मीडियातून चर्चिले जात आहे. यासंदर्भात अण्णांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना जसा ज्याचा चष्मा तसं त्याला दिसेल, असे उत्तर अण्णांनी दिलंय. ''मला एक महत्त्वाचं वाटलं, उच्चाधिकार समितीमध्ये सरकारचे आणि आमचे, या दोन्ही बाजुचे तज्ज्ञ घ्यायचं ठरलंय. तसेच, आम्ही जे 15 मुद्दे शेतकऱ्यांच्या हिताचे दिले होते, ते मुद्दे स्विकारत या मुद्द्यांवर उच्चाधिकार समितीमध्ये चर्चा होणार आहे. आता, हे आयोगासमोर जाण्यापूर्वी या उच्चाधिकार समितीमध्ये आमच्याही तज्ज्ञ मंडळींकडून सूचना व पाहणी होईल. त्यानंतर, अंतिम अहवाल आयोगाकडे जाईल. चुकीच्या गोष्टीला आमचे लोकं विरोध करतील,'' असे अण्णा हजारे यांनी सांगितले. 

सरकारकडे आपली जी मागणी होती, त्यासंदर्भात केंद्राच्या कृषीमंत्र्यांशी आणि इतरांशी चर्चा झाली, त्यानंतर मला आश्वासन दिलं. यासंदर्भात, अण्णांनी उपोषण घेतल्यामुळे तुमच्या विश्वासर्हतेवर काही परिणाम होईल, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अण्णांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मला वाटत नाही, आणि मला काही फरक पडत नाही. कारण, 100 टक्के लोकांचं मी समाधान करु शकत नाही. ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचं जग दिसतं अस उत्तर अण्णांनी एपीबी माझाशी बोलताना दिलंय. 

फडणवीसांनी मानले आभार

लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि मा. अण्णा हजारेजी यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारेजी यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवालसुद्धा यावेळी त्यांना सादर केला. अण्णा हजारेंनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे.

टॅग्स :अण्णा हजारेदेवेंद्र फडणवीसआंदोलनशेतकरी