स्मार्टफोनमुळे मानेचा त्रास वाढला
By Admin | Updated: November 23, 2015 01:02 IST2015-11-23T01:02:52+5:302015-11-23T01:02:52+5:30
एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून एका मुठीत आले आहे. स्मार्टफोन्समुळे एकाच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आणि लोकांशी संपर्क ठेवणे सहज शक्य झाले आहे.

स्मार्टफोनमुळे मानेचा त्रास वाढला
पूजा दामले, मुंबई
एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून एका मुठीत आले आहे. स्मार्टफोन्समुळे एकाच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आणि लोकांशी संपर्क ठेवणे सहज शक्य झाले आहे. पण, त्यामुळे सतत स्मार्टफोनचा वापर करण्यामुळे मानेचे दुखणे, हाडे ठिसूळ होणे आणि चष्म्याचा नंबर येण्यात वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत स्मार्टफोन असतो. त्यामुळे अनेकांच्या सवयी बदललेल्या आहेत. फोन करण्यापेक्षा मेसेज करण्याला पसंती दर्शवली जाते. तर दुसरीकडे टाइमपास म्हणून मोबाइलवर ‘गेम्स’ खेळणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण, यामुळे सतत हातात मोबाइल घेऊन बसलेल्या व्यक्तींना मानेचा त्रास जाणवू लागतो. मोबाइलमुळे मानेचे स्नायू, खांदेदुखी, अंगठा दुखणे हे सामान्य झाले आहे. आमच्याकडे अनेक रुग्ण अशी दुखणी घेऊन येत असल्याचे नानावटी रुग्णालयाचे आर्थ्रायटिस आणि जॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे संचालक डॉ. प्रदीप भोसले यांनी सांगितले. एकाच स्थितीत बसण्याची शरीराला सवय नसते. पण, मोबाइलच्या नादात अनेक जण तासनतास एकाच पद्धतीने बसून राहतात. त्यामुळे स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. मानेच्या स्नायूंवर ताण वाढल्याने खांदेदुखी सुरू होते. मोबाइल वापरताना अंगठ्यांचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यावेळी अंगठे दुखणे, हाताचा पंजा दुखणे असे त्रास वाढतात. यावर उपाय म्हणजे जास्त काळ विनाकारण मोबाइल वापरू नये. लहान मुलांना मोबाइलचा अधिक त्रास होतो. त्यांचे स्नायू बळकट नसल्याने थोड्याच दिवसांत त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. सतत १० तास संगणक अथवा मोबाइल फोन वापरल्यास डोळ्यांना अधिक धोका आहे. कारण, स्मार्टफोन्स आणि संगणकांमधून येणाऱ्या रेडिएशनचा परिणाम दृष्टिपटलावर होत असतो. पुढच्या १० ते १५ वर्षांत म्हणजे या तरुणांना वयाच्या ३५ ते ४० वर्षांत मोतीबिंदू होण्याचा धोका संभवतो. असे ते म्हणाले.