डहाणूतील सहा महिन्यात सहा फुगे कारखाने बंद
By Admin | Updated: March 10, 2015 22:36 IST2015-03-10T22:36:11+5:302015-03-10T22:36:11+5:30
दोन, तीन वर्षात मेड इन चायनाच्या मनमोहक, टिकाऊ तसेच स्वस्त फुग्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केल्याने डहाणूतील फुग्याला दिवसेंदिवस

डहाणूतील सहा महिन्यात सहा फुगे कारखाने बंद
शौकत शेख, डहाणू
दोन, तीन वर्षात मेड इन चायनाच्या मनमोहक, टिकाऊ तसेच स्वस्त फुग्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केल्याने डहाणूतील फुग्याला दिवसेंदिवस मागणी कमी होऊ लागली आहे. परिणामी, येथील असंख्य फुगे कारखाने आर्थिक संकटात सापडले असून गेल्या सहा महिन्यात सहा फुगे कारखाने बंद करण्याची वेळ कारखानदारांवर आली आहे. पंधरा हजार कुशल-अकुशल कामगारांचे भवितव्य अंधारात आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या वर्षभरात बहुसंख्य कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डहाणू तालुक्यात डहाणू, वडकुन, सरावली, सावटा, आशागड, गंजाड, वानगांव, इ. गावात तसेच परिसरात फुगे बनवणारे कारखाने आहेत. तेथे सुमारे पंधरा हजारांपेक्षा अधिक स्थानिक आदिवासी तसेच मितना समाजातील महिला पुरूष कुशल-अकुशल कामगार म्हणून काम करतात. शिवाय घराघरात फुगे पॅकींग करण्याचे काम मिळत असल्याने गावातच हजारो लोकांना रोजगार मिळत असतो. डहाणूतील फुग्यांना दिल्ली, पंजाब, मुंबई, कलकत्ता, राजस्थान, मद्रास तसेच मध्यप्रदेश येथे मोठी मागणी होती. परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून चायनाचे रंगीबेरंगी, स्वस्त फुगे भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने हळू हळू डहाणूतील फुग्यांना मागणी कमी होऊ लागली.
तीस ते चाळीस फुगे कारखानदारांनी तारेवरची कसरत करून कारखाने सुरू ठेवले आहेत. सरकारने चायनाच्या फुग्यांवर बंदी न घातल्यास वर्षभरात येथील फुगा निर्मितीचे सर्व कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहे. डहाणूतील असंख्य फुगे कारखाने वाचविण्यासाठी येथील कारखानदारांच्या एका शिष्टमंडळाने याबाबत केंद्र सरकारला एक निवेदन दिले आहे. मे महिन्यात मोदी सरकार पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेवर आल्यानंतर उद्योगक्षेत्रात चांगले बदल होतील या आशेमुळे उद्योजकांमध्ये चैतन्य पसरले होते. मात्र सहा, सात महिन्यांमध्ये फारसे बदल न झाल्याने लहान मोठे उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.