सिग्नल नियमांची झाली ऐशीतैशी
By Admin | Updated: August 26, 2015 04:11 IST2015-08-26T04:11:10+5:302015-08-26T04:11:10+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडले जात आहेत. यात सिग्नल नियमांचा तर चालकांना विसरच पडल्याचे दिसून आले आहे.

सिग्नल नियमांची झाली ऐशीतैशी
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडले जात आहेत. यात सिग्नल नियमांचा तर चालकांना विसरच पडल्याचे दिसून आले आहे. २0१५ च्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांतच तब्बल १ लाखपेक्षा जास्त जणांनी सिग्नल नियमांचे उल्लंघन केल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
सध्या बृहन्मुंबई विभागात (मुंबई मध्य, पूर्व, पश्चिम) एकूण २५ लाख २७ हजार ८७१ वाहने धावत आहेत. दिवसाला जवळपास ४00 पेक्षा अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे. वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या केसेसची नोंदही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. यात सिग्नलचे नियम मोडल्याच्या सर्वात जास्त केसेसची नोंद होत आहे. २0१५ च्या जानेवारी ते मे याच पाच महिन्यांतच १ लाख १५ हजार ९४४ चालकांनी सिग्नलचे नियम मोडले आहेत. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून १ कोटी ५७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सिग्नल नियम मोडल्याच्या गेल्या चार वर्षांतील आकडेवारीकडे पाहिल्यास वर्षाला ३ लाखपेक्षा अधिक केसेसची नोंद आहे. २0११ मध्ये वाहतूक नियमांच्या ३ लाख ५३ हजार ९८३ केसेस दाखल झाल्या होत्या.
त्या वेळी २ कोटी ३२ लाख ९४ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला होता. २0१५ च्या पाच महिन्यांतच जास्त केसेस दाखल झाल्याने डिसेंबरपर्यंत त्यांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.