भाजी विकू की स्वत:चा जीव सांभाळू? अंधेरी मंडईतील भाजीविक्रेत्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 15:12 IST2023-06-12T15:11:56+5:302023-06-12T15:12:03+5:30
पुनर्विकासातील अडथळ्यांमुळे मंडईची धड दुरुस्तीही केली जात नसल्याने ही मंडई धोकादायक झाली आहे.

भाजी विकू की स्वत:चा जीव सांभाळू? अंधेरी मंडईतील भाजीविक्रेत्यांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंधेरीतील दत्ताजी साळवी मंडईच्या पुनर्विकासाचे घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून भिजत पडले आहे. महापालिकेने पुनर्विकासाला मंजुरी देऊनही अद्याप विकास होऊ शकलेला नाही. पुनर्विकासातील अडथळ्यांमुळे मंडईची धड दुरुस्तीही केली जात नसल्याने ही मंडई धोकादायक झाली आहे.
मंडईत दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे फलक महापालिका प्रशासनाने मंडईत जागोजागी लावले असून, येथील गाळेधारक स्वतःच्या जबाबदारीवर व्यवसाय करीत आहेत. विमा कंपन्याही येथील गाळेधारकांना विमा काढण्यास नकार देत असल्याचे गाळेधारक सांगत आहेत. ७०० हून अधिक गाळेधारक असलेल्या या मंडईचा पुनर्विकास तेथील मच्छीमार बांधवांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने रखडला आहे.
पावसाळ्यात कमरेएवढे पाणी शिरत असलेल्या या मंडईत पालिकेकडून १८०० पासून १५ हजारांपर्यंतचे भाडे घेतले जाते. मात्र, छतांना टेकू म्हणून उभे केलेले लाकडी बांबू कधी कोसळतील, याच नेम नाही.