Join us  

Sanjay Raut: “दहशतवाद वाढलाय, किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा”; संजय राऊतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 1:20 PM

Sanjay Raut: काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढेच सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.

ठळक मुद्देकिरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवाकाश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहेया घटनांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते व सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. दुसरीकडे, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच असून, परिस्थिती चिघळली आहे. यातच आता काश्मीरमध्ये दहशवाद वाढला आहे. ED, CBI आणि किरीट सोमय्यांना तिकडे पाठवा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

ईडी (ED), सीबीआय (CBI) व एनसीबीला (NCB) जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप शक्तिशाली लोक आहेत. दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. फिरू द्या त्यांना जम्मू, काश्मीर, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये. दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मीर फिरत बसतील, असा संताप संजय राऊत यांनी यंत्रणांच्या कारवाईसंदर्भात बोलताना व्यक्त केला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 

चंद्रकांत पाटील यांना शोभते का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मीरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. याशिवाय कलम ३७० रद्द झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली की नाही, हे सांगता येणार नाही. तेथील परिस्थितीसंदर्भात बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होते. तिथे अनेक बंधने होती. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत आहे, हे गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 

संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे

काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून पडत आहेत. या घटनांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. चीन हा लडाख आणि तावांगमध्ये घुसला आहे. नुसत्या धमक्यांची भाषा करून हे थांबणार नाही. चीनवरही सर्जिकल स्ट्राइक करायला हवा, असे स्पष्ट करत पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊ द्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मीरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढेच सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :राजकारणसंजय राऊतकिरीट सोमय्याजम्मू-काश्मीरकेंद्र सरकार