Join us  

Ramdas Athawale: पवारांनी 'एनडीए'त यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं; रामदास आठवलेंनी सांगितला 'मास्टरप्लान'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 3:37 PM

Ramdas Athawale: शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावं आणि मोदी सरकारला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावं आणि मोदी सरकारला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. (Sharad Pawar Party, BJP Should Form Government In Maharashtra: Ramdas Athawale)

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करावी, असं रामदास आठवले एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन भिन्न विचारांचे पक्ष आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याची काहीच शक्यत नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतही रामदास आठवले यांनी सूचक विधान केलं. "शिवसेना आणि काँग्रेस देखील वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. पण आज ते सोबत आहेत. मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं देशाचं संविधान विविध विचारांच्या लोकांना एकत्र आणणारं आहे", असं रामदास आठवले म्हणाले. 

"शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा अशी माझी त्यांना विनंती आहे. राज्यात शिवसेनेला त्यांनी दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. काँग्रेस पक्ष देखील वारंवार तुम्हाला इशारा देत आहे. नाना पटोले हे शरद पवारांविरोधात वारंवार विधानं करत आहेत. त्यामुळे पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे", असं रामदास आठवले म्हणाले. यासोबतच शरद पवारांमुळेच राज्यात काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देत आहे. राज्याला ज्या पद्धतीचं प्रबळ सरकार हवं तसं हे सरकार अजिबात नाही, असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :रामदास आठवलेशरद पवारनरेंद्र मोदी