शक्ती, भक्ती, मुक्तीची युक्ती ‘योग’

By Admin | Updated: June 21, 2015 01:57 IST2015-06-21T01:57:52+5:302015-06-21T01:57:52+5:30

२१ जून हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे दक्षिणायान सुरू होते. योगविद्येत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी

Shakti, devotion, liberation trick 'yoga' | शक्ती, भक्ती, मुक्तीची युक्ती ‘योग’

शक्ती, भक्ती, मुक्तीची युक्ती ‘योग’

२१ जून हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे दक्षिणायान सुरू होते. योगविद्येत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी वरदान ठरणाऱ्या योगसाधनेची दुदुंभी जगभरात वाजविण्यासाठी २१ जून हाच दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत २७ सप्टेंबर २०१४ रोजी मांडला आणि तो संमतही झाला. या पार्श्वभूमीवर आज पहिलाच जागतिक योग दिन साजरा होत आहे. भारतासोबतच जगभरातील १७५ देश या महोत्सवात सक्रिय भाग घेत आहेत. आपल्यालाही वैयक्तिक पातळीवर त्यात सहभागी होता यावे, यासाठी काही आसनांची माहिती येथे देण्यात आली आहे.
-------------------------------------------
- संकेत सातोपे, मुंबई
जीवनाची सुरळीत चाललेली गाडी कुरकुरू नये म्हणून आणि कुरकुरणारी गाडी सुरळीत चालावी म्हणून अशा दोन्ही कारणांसाठी मानवी जीवनात योग महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगातील ‘लाइफस्टाइल’ आजारांना प्रतिबंध करायचा तर योग अत्यावश्यकच आहे, असे योगाचार्य डॉ. हंसराज यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शारिरीक , मानसिक, बौद्धिक, नैतिक, व्यक्तिमत्त्व विषयक अशा मानवी जीवनाच्या सर्वांगाचा विकास करण्यासाठी योग हे सर्वोत्तम साधन आहे, असा यादव यांचा दावा आहे. ते मुंबईस्थित भवन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात योगवर्ग चालविणाऱ्या योगभारतीचे संचालक आहेत. शक्ती, भक्ती, मुक्तीची युक्ती म्हणजे योगाभ्यास असे यादव यांचे सांगणे आहे.
विविध शारिरीक- मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या अनेक व्यक्तिंना आजवर यादव यांनी निरामय जीवनाच गुरुकिल्ली योगाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. योग ही कोणत्याही आजारावरील उपचार पद्धती नाही; तर योग आजाराची कारणे दूर करणारी जीवनपद्धती आहे. योग हे आपल्या जीवनाशी जोडलेलेच आहे. योगाविना आपण जगूच शकत नाही. कळत-नकळतपणे आपण योग करतच असतो. केवळ श्वास घेणे, हाही प्राणायामाचा एक प्रकार आहे, असेही यादव म्हणाले. सुखी-समाधानी-स्थिर जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक असणारी सत्य, अहिंसा, अस्तेय अशी शाश्वत तत्त्व योगाच्या माध्यमातून विकसीत केली जातात.
आयुष्य फार व्यग्र आहे. योग करण्यासाठी वेळ नाही अशा तक्रारी महानगरांमध्ये राहणारे लोक करतात. त्यावर यादव गुरुजी कानपिचक्या देताना म्हणतात की, माशाला जसा पाणी पिण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, तसाचा माणसाला योग करण्यासाठी विशेष वेळ द्यावा लागत नाही. योग त्याच्या आयुष्याचा भाग होऊन जातो. त्यातही रोज केवळ अर्धा तास प्रामाणिकपणे योग केला, तर आयुष्यातील अनेक समस्यांना दूर ठेवता येईल, असाही यादव यांचा दावा आहे.

-----------------------------------

आजच्या काळातील योगाचे महत्त्व!

- सुबोध तिवारी (सहसंचालक - प्रशासन, कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट)

योगाला भारताचा सांस्कृतिक वारसा समजले जाते. योगाची पाळेमुळे थेट सिंधू संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत. इसवी सन पूर्व २५०मध्ये महर्षी पतंजली यांनी योगावर १९५ सुभाषितांची सुभाषितमाला लिहिली होती. या सुक्तांमध्ये योगाला अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून देण्यात आले होते. त्यानंतर योगामधील इतर बाबी समजावून देणारे पतंजली योग सूत्र लिहिले गेले.
या सूत्रामध्ये एका बाबीवर विशेष भर देण्यात आला होता आणि तो होता - समन्वय (यम आणि नियम), शारीरिक कल्याण (आसने), मानसिक कल्याण (प्राणायाम), स्वत:वर बाह्य परिस्थितीचा कोणताही विपरीत परिणाम होऊ न देण्याची क्षमता (प्रत्याहार) आणि एकाग्रता, ध्यानधारणा आणि संपूर्ण समन्वय (धारण, ध्यान, समाधी) यांच्याकरिता काय करावे आणि करू नये याचे पालन करताना योगाची पायाभरणी करणे. कालांतराने, योगामुळे होणाऱ्या शारीरिक कल्याणाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. आपले काहीतरी चांगले होत आहे याची प्रचिती मानवाला आपल्या शरीरातूनच मिळत असल्याने हे झाले असावे. त्यामुळे सध्याचा योगा हा आसनांवर भर देणारा आहे. पण, योगाचा अभ्यास करणाऱ्यांना योगामध्ये आसनांपेक्षाही बरेच काही असल्याची प्रचिती आल्याने ते शास्त्रशुद्ध योगाचा अभ्यास करतात. शास्त्रशुद्ध योग सर्वांगीण कल्याण करणारा योग आहे, यम आणि नियम हे योगाचे मूलभूत घटक असून, चांगल्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा पाया आहेत.
आजच्या धकाधकीच्या काळात मन शांत ठेवण्याकरिता काहीतरी केले पाहिजे हे तरुण पिढीला कळू लागलेले आहे. कैवल्यधाममध्ये अनेक तरुण-तरुणी योगाचा अभ्यास करायला येतात. प्राणायामाच्या सत्रांना तर अनेक किशोरवयीन मुलेही बसताना आम्ही पाहिलेली आहेत.
-------------------------------------------------

योग आपल्या साऱ्यांसाठी! 

- संध्या पतकी, याेग शिक्षक 

आता जो तो योग करण्याच्या आणि शिकण्याच्या मागे नाही लागला तरच नवल! तेव्हा आसनांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने योग म्हणजे काय, ते समजण्याची आता फार मोठी गरज निर्माण झाली आहे. योगशास्त्रामध्ये मानसिकतेचा इतका शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, की २०००-२५०० वर्षांपूर्वी लिहिलेले हे विवेचन आजही चपखल लागू पडत आहे. पतंजली योगसूत्रात सुरुवातीलाच म्हटले आहे ‘योगश्चित्तवृत्ति निरोध:। तदा द्रष्टु: स्वरुपेवस्थानम्।’ योगसाधक निरुद्ध स्थिती प्राप्त करतो. निरीच्छ होतो, तो कर्मफलाच्या पलीकडे राहून कर्म करीत असतो. त्याचे कार्य नवीन कर्मबंधन निर्माण करीत नाही. कारण त्याला त्याच्या स्वरूपाचे दर्शन झाल्यामुळे तो इच्छा-आकांक्षाच्या पलीकडे पोहोचलेला असतो. म्हणून काही प्रत्येकाने हेच केले पाहिजे असे नाही. ज्याचा त्याचा मार्ग आणि साधना प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार(वृत्तीनुसार) अवलंबणार आहे.
आपण एकाग्र चित्त नसू तर कसे बनू, हे आपल्याला योग सांगते. यासाठी ३ प्रकारचे साधक वर्णन केले आहेत. सर्वसाधारण, मध्यम आणि उत्तम. समाधिपाद या योगसूत्राच्या पहिल्या भागात उत्तम साधकासाठी अभ्यास आणि वैराग्य हा मार्ग सांगितला आहे. अभ्यास म्हणजे अध्ययन, परिश्रम आणि वैराग्य म्हणजे आपण निमित्तमात्र आहोत ही जाणीव. अशी जाणीव सतत ठेवायची आहे. त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, अढळ निश्चय आणि झोकून देण्याची तयारी आवश्यक. एकदा काम करायला उभे राहिल्यवर... तुम्ही आॅफिसात असा, घरात असा, शाळेत असा की आपल्या व्यवसायाच्या जागी असा, ते पूर्णत्वास नेताना आपली भावना काय आहे ती निर्णायक! मी माझा स्वार्थ पाहत असेन तर तणाव वाढेल, कष्ट बोजड होतील आणि माझी बरीच शक्ती खर्च होईल. कदाचित फार मोठी किंमतही मोजावी लागेल. मी स्वत:पेक्षा व्यापक भावनेने, प्रेरणेने धडपड करीत असेन तर अजून शक्ती स्फुरत जाईल! आपलेच अगोदरचे अनुभव आठवून पाहा. तुम्हाला हे नक्की पटेल. निव्वळ आसने, प्राणायाम करून तेवढ्यावरच थांबू नका. योग आपले जीवन सोपे, सुखमय करण्यासाठी आहे.

-----------------------------------------
आर्थर रोड कारागृहातही योग दिन
लोणावळा येथील कैवल्यधाम या संस्थेच्या वतीने भायखळा येथील आर्थर रोड कारागृहातील कैद्यांनाही रविवारी योग शिकविण्यात येणार आहे. कैद्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करावे, त्यांचे मानसिक आरोग्य सुधारून, त्यांचा कल सदाचरणाकडे व्हावा, हा यामागील हेतू आहे. तसेच कैवल्यधाम या संस्थेच्या वतीने मुंबईत अन्य २० ठिकाणीही रविवारी योगवर्ग घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अमेरिका, थायलंड, फ्रान्स यांसारख्या देशांतही ही संस्था आज योग दिन साजरा करणार आहे.
-------------------------------------------------
मणक्याचे आजार असलेल्यांसाठी योगा
रविवारी निना या स्वयंसेवी संस्थेतील मणक्याच्या दुखापती असलेल्या व्यक्तींसाठी वुई स्कूल माटुंगा येथील निर्वाण दालनात विशेष योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मणक्याच्या दुखण्यावर आणि उच्चरक्तदाबावर योगाभ्यास विशेष उपयुक्त असल्याचे मत वुई स्कूल रिसर्च असोसिएशनचे अधिष्ठाता डॉ. केतन मेहेता यांनी सांगितले. तसेच मुंबईतील ताज व्हिवांता येथेही अनेक नामवंत उद्योगपती अय्यंगार योग ट्रस्टच्या गुरुजींसोबत योगाभ्यास करणार आहेत.
-------------------------------------
योग दालनाचे उद्घाटन !
योगदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजभवनातील योग दालनाचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी राव यांनी पद्मासनात बसून काही काळ ध्यानधारणाही केली. राजभवनाच्या पूर्वेकडे मरिन ड्राइव्हच्या दिशेने हे दालन तयार करण्यात आले असून, लवकरच ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या साक्षीने येथे योगप्रेमींना योगसाधना करता येणार आहे.
---------------------------------------------
जपानमध्येही योग!
भारताबाहेरही योगाचा झपाट्याने प्रसार होत आहे. जपानमध्येही मोठ्या संख्येने लोक योगविद्येकडे वळत आहेत. अनेक जण तर भारतात येऊन योगाचे प्रशिक्षण घेतात व जपानमध्ये येऊन योग शिकवित आहेत. जागतिक योगदिनानिमित्त आज आम्हीही जपानमध्ये ‘तोक्यो योगाथोन’ नावाने योग महोत्सव साजरा करीत आहोत. जपानी लोकांनी योगाकडे वळावे, हा यामागील उद्देश आहे. - डॉ. अनुपमा धाराशिवे आवाके, आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ, जपान

Web Title: Shakti, devotion, liberation trick 'yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.