सत्तावीस ग्रा.पं.चे दप्तर पोलीस संरक्षणात ताब्यात
By Admin | Updated: June 23, 2015 00:45 IST2015-06-23T00:45:53+5:302015-06-23T00:45:53+5:30
२७ गावे ग्रामपंचायतींचे दप्तर जमा करण्याची मोहीम सोमवार सायंकाळपासून पोलीस फौजफाट्यासह जि.प. आणि मनपा अधिकाऱ्यांनी सुरू केली

सत्तावीस ग्रा.पं.चे दप्तर पोलीस संरक्षणात ताब्यात
चिकणघर : २७ गावे ग्रामपंचायतींचे दप्तर जमा करण्याची मोहीम सोमवार सायंकाळपासून पोलीस फौजफाट्यासह जि.प. आणि मनपा अधिकाऱ्यांनी सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
१ जूनपासून २७ गावांचा समावेश शासनाने अध्यादेशान्वये मनपात केला आहे. यास विरोध म्हणून संघर्ष समितीने २२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कुलूप लावून संघर्षाची भूमिका घेतली. हे मोडून काढण्यासाठी सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पिसवली ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून अधिकाऱ्यांनी दप्तर ताब्यात घेतले.
ही घटना सत्तावीस गावांत वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांसह संघर्ष समितीचे पदाधिकारी पिसवली येथे आले. त्यांनी विरोध केला. मात्र तरीही अधिकारी जुमानत नसल्याचे पाहून रास्ता रोको सुरू केले. काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर सर्व पदाधिकाऱ्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. यामुळे भविष्यात संघर्ष समितीचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री आणि स्थानिक आमदार भोईर हे संघर्ष समितीचे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप समितीचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केला. १९ जून रोजी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले आणि ही कारवाई होते. याचा अर्थ पालकमंत्री फसवीत आहेत, असेही म्हात्रे म्हणाले.