सातपाटी खाडी होणार गाळमुक्त
By Admin | Updated: November 10, 2014 01:06 IST2014-11-10T01:06:11+5:302014-11-10T01:06:11+5:30
सातपाटी-मुरब्यातील मच्छीमारी कित्येक वर्षांपासून खाडीत साचलेल्या गाळात रुतून बसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून मच्छीमारांची या समस्येतून सुखरूप सुटका

सातपाटी खाडी होणार गाळमुक्त
पालघर : सातपाटी-मुरब्यातील मच्छीमारी कित्येक वर्षांपासून खाडीत साचलेल्या गाळात रुतून बसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून मच्छीमारांची या समस्येतून सुखरूप सुटका करण्यासाठी आलेला मालदार कंपनीचा ड्रेझर खाडीच्याच गाळात रुतून बसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे या ड्रेझरला आता उधाणाच्या भरतीची वाट पाहावी लागणार आहे.
ठाणे जिल्हा नियोजन समितीकडून सातपाटी-मुरबे खाडीत साचलेला गाळ काढण्यासाठी २६ कोटींचा निधी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक व राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे वर्ग करण्यात आला होता. या कामाचा ठेका मालदार कंपनीला देण्यात आल्यानंतर खाडीत साठलेला गाळ ड्रेझर व बार्जच्या साहाय्याने काढून तो खोल समुद्रात १२ नॉटीकल अंतराबाहेर टाकण्याची अट घालण्यात आली होती. परंतु, मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी देवरे व गद्रे यांच्यासह मालदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी ठेकेदाराला ठेका देत हा गाळ जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून गावातील मोकळ्या जागांवर टाकून अटी-शर्तींचा भंग केला होता. तसेच सातपाटीच्या खाडीत जलवाहतुकीसाठी डोळा ठेवून असणाऱ्या अरवाना या कंपनीच्या फायद्यासाठी गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी विलंबाने करीत असल्याचा आरोपही मच्छीमारांमधून केला जात होता. सुरू असलेल्या या चालढकलीमुळे खाडीतील मच्छीमारांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सर्वोदय सहकारी संस्था व अन्य मच्छीमार सहकारी संस्थांनी मेरीटाइमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र पाठवून गाळ काढण्यासंदर्भातील कामात दोन्ही संस्था व ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले जात नसल्याबाबत तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे यापुढे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी मेरीटाइमचे अधिकारी, मालदार कंपनीचे प्रतिनिधी यांनी दोन्ही संस्था व ग्रामपंचायत व तांडेल सभासदांना विश्वासात घेऊनच काम करावे, असे बजावले होते.
तसे न होता मनमानी कामामुळे मागील तीन दिवसांपासून एक ड्रेझर खाडीमध्ये न शिरता समुद्रातील गाळातच अडकून पडला आहे. सातपाटील दांडापाड्याच्या मुखापासून खाडीतील गाळ काढण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, अशी बहुतांशी मच्छीमारांची इच्छा असताना अनेकांचे निरनिराळे मतप्रवाह पुढे येत असल्याने दोन्ही संस्था व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानेच पदाधिकाऱ्यांना खाडीतील कामे करावी लागणार आहेत.
पुढच्या आठवड्यात उधाण असल्याने हा डे्रझर खाडीत शिरून कामाला सुरुवात होण्याची शक्यता असून या मिळालेल्या निधीतून खाडीतील गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटण्याच्या दृष्टीने सर्व मच्छीमारांनी कुठलीही अभिलाषा न ठेवता एकमताने काम करावे, असे सूर उमटत आहेत. (वार्ताहर)