पनवेल नगरपरिषद बसवणार सेन्सर मीटर
By Admin | Updated: June 21, 2015 23:05 IST2015-06-21T23:05:14+5:302015-06-21T23:05:14+5:30
पाणीपुरवठ्यामध्ये पारदर्शकता तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य मोजमाप करण्याच्या दृष्टीने पनवेल नगरपरिषद पाऊल उचलणार असून महावितरणच्या धर्तीवर

पनवेल नगरपरिषद बसवणार सेन्सर मीटर
वैभव गायकर, पनवेल
पाणीपुरवठ्यामध्ये पारदर्शकता तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य मोजमाप करण्याच्या दृष्टीने पनवेल नगरपरिषद पाऊल उचलणार असून महावितरणच्या धर्तीवर पनवेलमध्ये पाणीपुरवठ्याच्या जोडणीला सेन्सर मीटर बसविण्याचा प्रस्ताव नगरपरिषद येत्या सर्वसाधारण सभेत सादर करणार आहे.
पनवेलची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. तसेच शहरात ११ हजार ग्राहक आहेत त्यापैकी केवळ मीटरधारक ग्राहकांची संख्या अवघी हजाराच्या घरात आहे. उर्वरित ग्राहकांना माफक दरात पाणीपुरवठा केला जातो. सध्याचे पाणी मीटर हे ब्रासचे असून त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता जास्त आहे. हे मीटर पाण्याच्या दाबाने आपोआप बंद पडल्याचेही प्रकार घडले आहेत. हे मीटर पाण्याच्या रीडिंगचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने देखील अनुकूल नसल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा अनावश्यक वापर सुरु असतो तर काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासताना देखील मीटरमध्ये योग्य प्रमाणात रीडिंग होत नसल्याने सेन्सर मीटर बसविण्यासाठी नगरपरिषद सकारात्मक असल्याचे समजते. नगरपरिषद शहरात पाणी पुरवठा करताना दरवर्षी ५ कोटी तोट्यात असते. त्यामुळे होणारे हे नुकसान सेन्सर मीटरमुळे भरुन येणार आहे.
सेन्सर मीटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेले असल्यामुळे १० ते १५ वर्षे हे मीटर हे खराब होणार नाहीत तसेच या मीटरमध्ये पाणीपुरवठ्या बाबत पारदर्शक माहिती रीडिंगद्वारे मिळणार आहे. नगरपरिषदेला देखील यामुळे नफा मिळणार आहे. या प्रस्तावाचा ग्राहकांवर कमीत कमी भार पडेल याची दक्षता नगरपरिषद घेणार आहे. शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर आहे. शहराला एकूण २६ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. देहरंग धरणातून १० एमएलडी तर एमआयडीसी व एमजेपीमार्फत एकूण १६ एमएलडी पाणीपुरवठा नगरपरिषदेला केला जातो. मात्र एमजेपीमार्फत वारंवार पाणीपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे पनवेलकरांचे पाण्याअभावी हाल सुरु असतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगरपरिषदेमार्फत ठोस उपाययोजना राबविताना दिसून येत नाही. सेन्सर मीटरप्रमाणे शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी नगरपरिषदेने अशाप्रकारच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी पनवेलकर करीत आहेत.