Join us  

Video : मनसेचा 'भोपळा' फोडणारे राजू पाटील 'कृष्णकुंज'वर येताच राज ठाकरेंनी काय केलं बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 4:28 PM

मनसेचे पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते.

मुंबई - राज ठाकरेंच्यामनसेने राज्यात 100 जागा लढविल्या. मात्र, मनसेच्या इंजीनने कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला गती दिली आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी सेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत राज्यात एकमेव जागा मिळवली आहे. शिवसेनेला अत्यंत थोड्या-थोडक्या मतांनी पराभवाची धूळ खावी लागली आहे. त्यानंतर, मनसे राज्यातील एकमेव विजयी उमेदवार राजू पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज यांनी भेट घेतली. त्यावेली, राज ठाकरेंच्या कुटुंबीयांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.  

मनसेचे पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. 2014 मध्ये त्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली. अत्यंत कमी दिवसांत त्यांनी हायटेक प्रचार केला. सोशल मीडियावर ते प्रभावी ठरले. बदल हवा आहे, अशी त्यांच्या प्रचाराची टॅगलाइन होती. कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी त्यांना कौल दिला. 

प्रमोद पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी, राज यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या स्वागताला हजर होते. यावेळी, औक्षण करुन त्यांच्या विजयाचं अभिनंदन करण्यात आल. यावेळी, राज यांच्या कृतीने राजू पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांची मने जिंकली. राज यांनी स्वत:च्या आसनावर बसण्याची विनंती आमदार राजू यांना केली होती. मात्र, राजू यांनी विनम्रपणे ही विनंती नाकारली. राज यांच्यासह शर्मिला ठाकरेंनीही राज यांच्या आसनावर बसण्याचा आग्रह केला होता. मात्र, राजू यांनी हा आग्रह विनंतीपूर्वक नाकारला. त्यानंतर, बाजुच्या खुर्चीवर बसल्यानंतर शर्मिला ठाकरेंकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी, राजू यांनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचे आशीर्वादही घेतले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेकल्याण ग्रामीणमुंबईविधानसभा निवडणूक 2019