Join us  

२०२० या वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 6:15 PM

२०२० या वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण ५ जून २०२० होणार असून ते मांद्य किंवा छायाकल्प प्रकारचे आहे.

मुंबई : २०२० या वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण ५ जून २०२० होणार असून ते मांद्य किंवा छायाकल्प प्रकारचे आहे. या चंद्रग्रहणाच्यावेळी चंद्र लालसर तांबूस (ब्लडमून) दिसतो. हे ग्रहण भारतातून दिसणार आहे. यावर्षीच्या पहिले चंद्र ग्रहण १० जानेवारी २०२० ला झाले होते. त्यानंतरची तीनही चंद्रग्रहणे छायाकल्प किंवा मांद्य  याच प्रकारची असतील. यानंतर ३० नोव्हेंबर २०२० रोजी तिसरे चंद्र ग्रहण भारतातून दिसणार आहे. तर चौथे चंद्र ग्रहण ५ जुलै २०२० रोजी होणार आहे. पण भारतातून ते दिसणार नाही.भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, अशावेळी चंद्ग्रहण होते. चंद्रग्रहण खंडग्रास आणि खग्रास अशा दोन प्रकारचे असते. चंद्र शंभर टक्के झाकला जातो, ते खग्रास, तर चंद्र ९० टक्क्यापर्यंत झाकला जातो ते खंडग्रास प्रकारचे चंद्रग्रहण असते. चंद्र विरळ छायेमधून जाणार असल्यास अशा ग्रहणाला मांद्य किंवा छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते व तिघे साधारणतः एका रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची चंद्रावर पडणार्‍या सावलीमुळे चंद्र किंवा चंद्राचा काही भाग छाकला जातो. या सावलीमुळे चंद्राच्या पौर्णिमेला दिसणाऱ्या स्थितीला 'चंद्र ग्रहण' असे म्हणतात. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही.एका वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे होऊ शकतात. यातील ४ ते ५ सूर्यग्रहणे, तर उरलेली चंद्रग्रहणे असतात. एका वर्षात कमीत कमी दोन ग्रहणे होतातच. मात्र त्यावेळी ही दोन्ही ग्रहणे सूर्यग्रहण असतात. चंद्रग्रहणाच्या तुलनेत सूर्यग्रहणे संख्येने अधिक असतात. पण चंद्रग्रहण पृथ्वीच्या अर्ध्या भागावरून दिसते तर सूर्यग्रहण पृथ्वीच्या फारच कमी भागावरून दिसते. त्यामुळे चंद्रग्रहण पाहिलेले लोक जास्त आहेत तर सूर्यग्रहण पाहिलेले लोक कमी आहेत, असेही जोहरे यांनी सांगितले.---------------------------------- चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.- पृथ्वी व चंद्रामधील सरासरी अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे.- चंद्राचे उपपृथ्वी म्हणजे पृथ्वी पासूनचे कमीतकमी अंतर ३,६३,१०४ कि.मी आहे.- चंद्राचे अपपृथ्वी म्हणजे पृथ्वी पासूनचे जास्तीत जास्त अंतर ४,०५,६९६ कि.मी. इतके आहे.- चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे.- चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २ टक्के आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७ टक्के इतकी आहे.---------------------------------

टॅग्स :चंद्रग्रहणभारत