झोपड्यांच्या सर्व्हेत दिशाभूल!
By Admin | Updated: June 3, 2015 04:14 IST2015-06-03T04:14:14+5:302015-06-03T04:14:14+5:30
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील जरीमरी, संदेश नगर, सेवक नगर आणि क्रांती नगरमधील झोपड्यांची पात्र-अपात्रता निश्चित करण्यासाठी सुरू झालेल्या

झोपड्यांच्या सर्व्हेत दिशाभूल!
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील जरीमरी, संदेश नगर, सेवक नगर आणि क्रांती नगरमधील झोपड्यांची पात्र-अपात्रता निश्चित करण्यासाठी सुरू झालेल्या सर्व्हेदरम्यान अधिकृत झोपडीधारकांची दिशाभूल केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे अनधिकृत झोपड्या उभारून त्या पात्र करून घेण्यासाठी दलालांचा क्रांती नगर झोपडपट्टीला विळखा पडला असून, या प्रकरणात प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
१८ मे रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जरीमरी, संदेश नगर, सेवक नगर आणि क्रांती नगरमधील झोपड्यांच्या पात्र-अपात्रतेच्या निश्चितीचे काम हाती घेतले. हे काम करण्यासाठी घटनास्थळी दाखल होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संंबंधित रहिवाशांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे-पुरावे सादर करावे, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले. मात्र सर्व्हे सुरू होणार या वृत्ताचा सुगावा लागताच येथे रातोरात अनधिकृत झोपड्या उभ्या राहू लागल्या आणि या अनधिकृत झोपड्यांचा आकडा थेट १४० वर पोहोचला.
सद्य:स्थितीमध्येही येथे अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम सुरू असून, हे बांधकाम करणाऱ्या दलालांवर कारवाई होत नाही; हे दुर्दैव आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील एका झोपडीसाठी ८ लाखांची किंमत लावली जात असून, ती उभारण्यासाठी ७० हजारांचा खर्च आहे. झोपड्यांच्या सर्वेक्षणातील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने मांडल्यानंतर अधिकाऱ्यांसह दलालांचेही धाबे दणाणले आणि जणू काही येथे अनधिकृत बांधकाम सुरू नसल्याचा आव आणण्यात आला. प्रत्यक्षात मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा सातत्याने लावून धरण्यात आल्यानंतर येथील अधिकृत झोपडीधारकांनी वृत्ताचे स्वागत केले. शिवाय अप्रत्यक्षरीत्या पाठिंबाही दर्शविला.
आताही रात्री-अपरात्री क्रांती नगरमध्ये चार-एक अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम सर्रास सुरू असून, अधिकारी वर्ग मात्र मूग गिळून गप्प बसला आहे.
केवळ कारवाई केली हे दाखविण्यासाठी ‘एल’ विभागाने येथील ४ झोपड्या जमीनदोस्त
केल्या खऱ्या. परंतु अद्यापही २०१० सालच्या सर्व्हेदरम्यान जो जुना
क्रमांक पडला होता; त्या क्रमांकापासून हा नवा सर्व्हे सुरू करण्यात यावा आणि सर्व्हेत
सातत्य ठेवण्यात यावे; यासह दलालांना येथे थारा देण्यात येऊ नये, असे भाजपाचे कालिना विधानसभा सचिव राकेश पाटील यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)