आंदोलनानंतर मिळाले शाळेला दोन शिक्षक
By Admin | Updated: June 23, 2015 00:57 IST2015-06-23T00:57:05+5:302015-06-23T00:57:05+5:30
वाडा तालुक्यातील तिळमाळ या अतिदुर्गम गावातील शाळा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आ

आंदोलनानंतर मिळाले शाळेला दोन शिक्षक
वाडा : वाडा तालुक्यातील तिळमाळ या अतिदुर्गम गावातील शाळा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी या संदर्भात शिक्षण विभागाकडे तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याखाली सोमवारी (दि. २२) गटशिक्षण अधिकाऱ्यांना दोन तास घेराव घातला. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याचे लेखी आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले.
तिळमाळ हे गाव अतिदुर्गम भागात असून येथे पावसाळ्यात जाण्यायेण्याची समस्या गंभीर आहे. येथे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून २० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेवर राजू महाले हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र १५ जूनचा एकच दिवस शाळा उघडण्यात आली. त्यानंतर आज पर्यंत शाळा बंदच आहे. ग्रामस्थांनी वाडा गटशिक्षणाधिकारी जे. के. पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र शिक्षण विभाग त्याकडे गांभीर्याने बघत नव्हते. शेवटी ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेला आपली व्यथा सांगितली. सोमवारी श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला.