‘स्वच्छ भारत’चे वेळापत्रक कोलमडले
By Admin | Updated: February 14, 2015 22:24 IST2015-02-14T22:24:18+5:302015-02-14T22:24:18+5:30
स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेची समितीच गठीत झालेली नाही, त्यामुळे जिल्हास्तरीय कृती आराखड्यात कोणत्याच ग्रामपंचायतीची निवड अद्याप करण्यात आलेली नाही.

‘स्वच्छ भारत’चे वेळापत्रक कोलमडले
आविष्कार देसाई - अलिबाग
स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेची समितीच गठीत झालेली नाही, त्यामुळे जिल्हास्तरीय कृती आराखड्यात कोणत्याच ग्रामपंचायतीची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. सरकारने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यात या मिशनला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या बेफिकीरीचा फटका स्वच्छ भारत अभियानाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयाने ३ फेब्रुवारी २०१५ ला सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या निवडीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी. समितीचे सदस्य सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून समितीची सभा १२ फेब्रुवारी २०१५ पर्यंत आयोजित करावी, त्याचप्रमाणे कृती आराखड्यात लाभार्थी ग्रामपंचायतींची निवड करावी आणि समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायतींची नावे १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत कळवावीत, असे सांगण्यात आले आहे. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे मिशन फारसे गांभीर्याने घेतलेले नाही.
१५ फेब्रुवारी ग्रामपंचायतींची निवड
१५ मार्च स्वच्छता मेटची निवड व प्रशिक्षण
३१ मार्चस्वच्छता मेटचे प्रशिक्षण
३१ मार्च वैयक्तिक शौचालयांच्या कामांना तांत्रिक, प्रशासकीय मान्यता
१ एप्रिलप्रत्यक्ष कामाला सुरुवात
३० जूनआर्थिक वर्षाच्या लक्षांकाच्या २५ टक्के कामे पूर्ण करणे.
३० सप्टेंबरआर्थिक वर्षाच्या लक्षांकाच्या ५० टक्के कामे पूर्ण करणे.
३१ डिसेंबरआर्थिक वर्षाच्या लक्षांकातील सर्व कामे पूर्ण करणे.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनची समितीच गठीत झाली नसल्याने सभा झालेली नाही. त्याचप्रमाणे कृती आराखडाही तयार झाला नाही. उपमुख्य कार्यकारी पुंडलिक साळुंखे हे कामानिमित्त सध्या दौऱ्यावर आहेत. समिती गठीत करण्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येणार असून २०१९ चे लक्ष्य पूर्ण करण्यात येईल.
- जयवंत गायकवाड, कार्यक्रम व्यवस्थापक, रायगड जिल्हा परिषद.