बेपत्ता संजय होता जौनपूरला
By Admin | Updated: June 8, 2015 04:41 IST2015-06-08T04:41:54+5:302015-06-08T04:41:54+5:30
महिनाभरापासून विटाव्यातील आनंदनगर भागातून अचानक बेपत्ता झालेल्या कोमल ऊर्फ लक्की संजय मिश्रा (२०) याचा थेट उत्तर प्रदेशातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने शोध घेतला आहे.

बेपत्ता संजय होता जौनपूरला
ठाणे : महिनाभरापासून विटाव्यातील आनंदनगर भागातून अचानक बेपत्ता झालेल्या कोमल ऊर्फ लक्की संजय मिश्रा (२०) याचा थेट उत्तर प्रदेशातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने शोध घेतला आहे. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधल्यानंतर त्याचे वडील संजय हे त्याला ठाण्यात घेऊन आले. त्याच्या क्रिकेटच्या छंदामुळे वडिलांची त्याच्यावर नाराजी होती. त्यासाठी लागणारा पैसाही त्याला मिळवायचा होता. याच कारणामुळे घर सोडल्याचे त्याने सांगितले.
बांधकाम व्यावसायिक संजय मिश्रा यांचा मुलगा लक्की २५ एप्रिल २०१५ रोजी अचानक कुटुंबीयांना काहीही न सांगता घरातून ३५ हजार रुपये घेऊन निघून गेला होता. दोन दिवस वाट पाहूनही तो न परतल्यामुळे २६ एप्रिल रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बिल्डर असल्याने मुलाचे कोणी अपहरण तर केले नसावे ना, या संशयाने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती.
मुलाचा शोध घेण्याबाबत ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याकडे २८ एप्रिल रोजी त्यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार, युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, उपनिरीक्षक एन.एल. हायलिंगे, कमरुद्दीन शेख आणि हवालदार पी.एच. पाटील या पथकाने त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला. त्याने त्याचा मोबाइलही घरीच ठेवल्यामुळे तपास करणे अवघड जात होते. अखेर, हितेश गुप्ता, रा. विटावा याचा पोलिसांनी पत्ता मिळविला. लककीने त्याच्याकडे बूट आणि क्रिकेटचे साहित्य ठेवले आणि २५ हजार रुपये घेऊन गेला. तो गावी गेल्याची शक्यता त्याने वर्तविली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर या त्याच्या मामाच्या गावी संपर्क करून त्याचा शोध घेतला. तो तेथेच असल्याची खात्री झाल्यानंतर संजय यांनी गावी जाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याला चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने ३ जून रोजी लक्ष्मीनारायण यांच्यासमोरच अधिकृतपणे वडिलांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलाचा शोध घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्याला दोन मुले असून लक्कीच्या शिक्षणासह त्याला जे जे पाहिजे त्या सर्वांसाठी पैसेही दिले. तरीही, तो घरातून का गेला, याचे शल्य मनाला बोचत असल्याचे मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बेपत्ता मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक असल्याने मुलाचे अपहरण झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तत्परतेने या प्रकरणाचा छडा लावला.
(प्रतिनिधी)
क्रिकेटच्या वेडामुळे वडिलांची होती नाराजी
पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधल्यानंतर त्याचे वडील संजय हे मुलाला ठाण्यात घेऊन आले. त्याच्या क्रिकेटच्या छंदामुळे वडिलांची त्याच्यावर नाराजी होती. त्यासाठी लागणारा पैसाही त्याला मिळवायचा होता. याच कारणामुळे घर सोडल्याचे त्याने सांगितले.