सण आयलाय नारली पुनवेचा...

By Admin | Updated: August 29, 2015 02:40 IST2015-08-29T02:40:58+5:302015-08-29T02:40:58+5:30

‘सण आयलाय गो नारली पुनवेचा’ या लोकप्रिय कोळीगीतावर ठेका धरत शनिवारी (२९ आॅगस्ट) मुंबईतील विविध कोळीवाड्यांत नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाईल.

Sani Ayala Kareli Revech ... | सण आयलाय नारली पुनवेचा...

सण आयलाय नारली पुनवेचा...

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई
‘सण आयलाय गो नारली पुनवेचा’ या लोकप्रिय कोळीगीतावर ठेका धरत शनिवारी (२९ आॅगस्ट) मुंबईतील विविध कोळीवाड्यांत नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाईल. याचवेळी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण करून सुखसमाधानाची प्रार्थनाही केली जाईल.
यंंदापासून केंद्राप्रमाणे राज्य सरकारचा मासेमारीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा होता. मात्र तसे असले तरी अद्यापही मासेमारीला सुरुवात झालेली नाही. मासेमारीच्या नव्या मोसमासाठी मुंबईतील विविध कोळीवाड्यांतील बोटी रंगरंगोटी, पताका, झेंडे, विद्युत रोषणाई करून सज्ज झाल्या आहेत.
नारळीपौर्णिमा साजरी करण्यासाठी वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, धारावी, माहुल, वरळी, कुलाबा या मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांत गावी गेलेले खलाशी आणि आपल्या कुटुंबासह पर्यटन-देवदर्शनासाठी गेलेल्या कोळी महिला आता मासेविक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. नारळीपौर्णिमेनंतर मासेमारीसाठी गेलेल्या नौका ३-४ दिवसांनी ताजं म्हावरं घेऊन परतल्यानंतर पुढच्या रविवारी मुंबईकरांना ताजी मासळी मिळेल, असा विश्वासही मरोळ बाजार मासे विक्रेता कोळी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री भानजी यांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी सायंकाळी ५ नंतर वेसावे गावातील ९ गल्ल्यांमध्ये नारळीपौर्णिमेच्या भव्य मिरवणुका कोळीगीतांच्या ठेक्यावर निघणार आहेत. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून येथील तेरे गल्ली, बुधा गल्ली, गोमा गल्ली, पाटील गल्ली, बाजार गल्ली, मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली, शिव गल्ली या विविध गल्ल्यांचे अध्यक्ष समुद्राला नारळ अर्पण करणार आहेत. नारळाच्या करंज्यांचा (पूर्ण्या) नैवेद्य आपल्या बोटींना दाखवून बोटीची यथासांग पूजा येथील कोळी महिला करणार आहेत.
धन्याचे रक्षण कर आणि आमच्या मुबलक मासोळी गावू दे, अशी प्रार्थना कोळी महिला करणार असल्याचे वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी सांगितले. स्वाध्याय परिवार मिरवणूक काढणार असून, त्यामध्ये महिलांच्या डोक्यावर कलशात ठेवलेला नारळ सायंकाळी समुद्राला अर्पण केला जाणार आहे.

नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन... अथांग सागरापुढे नतमस्तक होण्याचा आणि बहीण-भावाचे नाते आणखी दृढ होण्याचा हा दिवस! सागराची साथ लाभलेल्या मुंबई आणि उपनगरांत हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. उत्सवाच्या विविध रंगांवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...

वरळी कोळीवाड्यात नारळीपौर्णिमेचा सण देखणा असतो. माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टच्या सजवलेल्या होडीवरून आणि हिरा कापर जमातच्या सजवलेल्या पालखीची मिरवणूक निघते. पारंपरिक वेशात कोळीगीतांच्या तालावर ठेका धरला जातो. आलेल्या मान्यवरांना खास कोळी पद्धतीच्या टोप्या भेट दिल्या जातात.

आमच्या कुटुंबाचे वादळ-वाऱ्यापासून रक्षण कर, अतिरेकी हल्ल्यावर लक्ष ठेवून भारमातेचे रक्षण कर, असे गाऱ्हाणे सागराला घातले जाते. बातेरी या जागी नारळ अर्पण करण्याचा मान हा माणिक धर्मा पाटील जमातचे अध्यक्ष विजय वरळीकर आणि हिरा कापर जमातचे अध्यक्ष देवेंद्र कासकर यांना जातो.

वरळी कोळीवाड्यात नारळीपौर्णिमेच्या तयारीची लगबग एक महिना आधी सुरू होते. येथे हाताने नारळ फोडण्याच्या स्पर्धा रंगतात. सुमारे एक महिनाभर चालत असलेल्या या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत हजारो नारळ फुटतात. ज्याच्या हातातील नारळ फुटेल त्याच्या प्रतिस्पर्ध्याला तो नारळ मिळतो.

Web Title: Sani Ayala Kareli Revech ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.