सांडपाण्याच्या दर्पाने विद्यार्थी हैराण
By Admin | Updated: March 10, 2015 00:21 IST2015-03-10T00:21:27+5:302015-03-10T00:21:27+5:30
शहरातील शांती प्रकाश शाळेच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्यातील अॅसिडयुक्त सांडपाण्याच्या दर्पाने दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी हैराण झाले

सांडपाण्याच्या दर्पाने विद्यार्थी हैराण
उल्हासनगर : शहरातील शांती प्रकाश शाळेच्या मधोमध वाहणाऱ्या नाल्यातील अॅसिडयुक्त सांडपाण्याच्या दर्पाने दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी हैराण झाले असून याचा परिणाम अंतिम निकालावर पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. परीक्षा केंद्राच्या मधून नाला जात असल्याने सर्वत्र जीवघेणा दर्प पसरला आहे.
जीन्स कारखान्यातील सांडपाणी ज्या नाल्यात सोडले जाते तो नाला स्वामी शांती प्रकाश शाळेच्या मधून वाहत असून येथील उग्र दर्पाने विद्यार्थी हैराण झाले आहेत. याचा त्रास होऊन विद्यार्थ्यांना डोके जड होणे, गुंगी येणे, डोके दुखणे अशा त्रासांना तोंड द्यावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले़ या कारखान्यावर कारवाई करा. अन्यथा त्यांचे सांडपाणी भुयारी गटारीत सोडण्याची मागणी शाळेने अनेकदा पालिकेकडे केली आहे.