Join us  

Sachin Vaze: मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं शिवसेनेला काय लाभ होईल?; निवृत्त सनदी अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:31 PM

Mukesh Ambani Bomb Scare: गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया, जनता, विरोधक यांना खुश करण्यासाठी एन्काऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कुठलाच एन्काऊंटर होऊ शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृह मंत्र्यांना भेटतख्वाजा युनूसचा काटा सचिन वाझेनी ज्या पद्धतीने काढला होता ती फार अमानवी केस होती ते लपविण्यासाठी केलेली धडपड अशीच पोरकट होतीगुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्याचे श्रेय त्याला मिळणार होते.

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली, या प्रकरणात सध्या NIA कडून तपास सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकींचा सिलसिला सुरु आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. यातच निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी या प्रकरणावर फेसबुक सविस्तर पोस्ट केली आहे.(Retired Police Officer Suresh Khopade Facebook Post on Sachin Vaze Case)

सुरेश खोपडे म्हणतात की, सचिन वाझेंच्या करामतीमुळे मुंबई पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे व आणखी चर्चा व्हायला पाहिजे. मुंबई रेल्वे पोलिस कमिशनर म्हणून तीन वर्षे नंतर उत्तर मुंबई विभागाचे अॅडिशनल पोलिस कमिशनर म्हणून मी अडीच वर्षे मुंबईत काम केले होते. मुंबईतील वातावरण,तिथली गुन्हेगारी हे माझ्या सारख्याला अलीबाबाची गुहाच होती. मुंबई शहरातील एन्काऊंटर यावर मी खूप मटेरियल गोळा केले होते. मारल्या गेलेल्या बळींची सर्वांगाने माहिती गोळा करणे सुरू केले. दोन निलंबित एन्काऊंटर स्पेशालिस्ट माझ्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जोडले गेले होते ते संशोधन पूर्ण करू शकलो नाही पण त्या विषयाचं भयानक वास्तव पुढे आले आणि उत्तरही सापडले की इथली "गुन्हे न्याय व्यवस्था(criminal justice system) कालबाह्य"आहे. ती बदलण्या ऐवजी तात्पुरता इलाज म्हणून गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा देण्यासाठी तसेच मीडिया, जनता, विरोधक यांना खुश करण्यासाठी एन्काऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट.

वाचा सुरेश खोपडे यांची पोस्ट जशी आहे तशीच..

पोलीस आयुक्तांच्या परवानगी शिवाय कुठलाच एन्काऊंटर होऊ शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृह मंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असत. अमाप पैसा,अमाप दहशत,अमाप प्रसिद्धी,अमाप अधिकार.असे वाझें कुणाला घाबरतील? त्यांच्यावर अंकुश कोणता? ख्वाजा युनूसचा काटा सचिन वाझेनी ज्या पद्धतीने काढला होता ती फार अमानवी केस होती ते लपविण्यासाठी केलेली धडपड अशीच पोरकट होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट असे अघोरी व धोकादायक कृत्य कुणासाठी करत असावेत? समाजात शांतता सुरक्षितता राहावी म्हणून? एक कर्तव्य,जबाबदारी म्हणून? सत्याची चीड म्हणून? पुढाऱ्यांच्या सांगण्या वरून? की...माझ्या निरीक्षणावरून या पैकी कोणतेच नाही! दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तयार होत नाहीत! व्यक्तिगत फायदा (आर्थिक,मेहेरबानी,भावनिक...)असल्या शिवाय असे कृत्य करायला तयार होत नाहीत.

अंबानींच्या घरा समोर स्फोटके ठेवल्याने गृहमंत्री अगर मुख्यमंत्री यांना काय लाभ होणार? सरकार अगर शिवसेनेला (Shivsena) कुठला लाभ होईल? काही होईल असं मला तरी वाटत नाही. वाझेना व्यक्तिगत मोठा लाभ होईल असा त्याचा होरा असावा. मुकेश अंबानी हे जगातील एक श्रीमंत व्यक्ती.. त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळल्याचे, गुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्याचे श्रेय त्याला मिळणार होते. राज्य व केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शाबासकी मिळाली असती. अर्णबच्या केसमध्ये केंद्रीय गृह मंत्री नाराज होते ते खुश झाले असते. या सगळ्याचा फायदा ख्वाजा युनुसची जी केस त्याचे विरूद्ध चालू आहे त्यातून सुटण्यास मदत झाली असती. असा हेतू वाझेंच्या मनात असावा असे आतातरी वाटते,पुढे वेगळेही कारण निघू शकते. पाहू.

अशा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा राजकारणात दबदबा असतो. वाझे तर शिवसैनिकच होते. प्रचंड पैसा असल्याने ते खूप होत्याचे नव्हते करणारे (great manipulator) असतात. कोणत्याही सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात. नवख्या राजकारण्यांना त्याची चाल समजून येत नाही. बऱ्याच वेळा मनोधैर्य खच्ची व्हायला नको म्हणून राजकारणी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते सरकारलाच गोत्यात आणतात. त्यातून सचिन वाझे,भूषण उपाध्याय... निर्माण होतात .महाराष्ट्रात सात लाखापेक्षा जास्त लोक असताना सरकारला एका सचिन वाझेंची गरज का भासावी? तो एवढा शिरजोर का बनावा? कारण प्रशासनात सगळ्या लोकांचा वापर कसा करायचा याची शास्त्र शुद्ध व्यवस्था नाही. मुळात पोलीस व्यवस्था कालबाह्य आहे. मलाच फार समजत वा अक्कल आहे असा माझा दावा नाही पण इतर दुसरा पर्याय मिळेपर्यंत मी केलेल्या शिफारशी विचारात घ्या असे मी प्रत्येक सरकारला विनंती करत असतो. तशी महाविकास आघाडी सरकारलाही केलीय. बहुंतांश मीडिया,जनता, विरोधी पक्ष,विचारवंत, साहित्यिक अशा प्रश्नांची उत्तरे व्यक्ती मध्ये शोधतात. मग सचिन वाझे, परमबीर सिंग,  देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) या नावांचा उच्चार होतो. वेळोवेळी नाव बदलतात. व्यवस्था तीच रहाते. महाराष्ट्राच्या या अवस्थेस कोण जबाबदार?कोण दोषी? माणसामध्ये १० टक्के दोष तर ९० टक्के इथली व्यवस्था जबाबदार /दोषीआहे. सचिन वाझे, परमबीर सिंग, भूषण उपाध्याय... या महामानवांच्या निर्मितीची मुळे या व्यवस्थेत दिसतात. या सरकारलाही मी या शिफारशी पाठविल्यात!

 मी माझं काम करतो...कुणी वंदा या निंदा.

सुरेश खोपडे

 

टॅग्स :सचिन वाझेमुकेश अंबानीशिवसेनाउद्धव ठाकरे