'रो रो जेट्टीमुळे गावपण, शांतता नष्ट होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:50 IST2020-02-25T00:49:59+5:302020-02-25T00:50:47+5:30

मनोरी-गोराईवासीयांत असंतोष; जेट्टीचा वापर धनदांडग्यांना होईल

'Roe Jetty will destroy village, peace' | 'रो रो जेट्टीमुळे गावपण, शांतता नष्ट होईल'

'रो रो जेट्टीमुळे गावपण, शांतता नष्ट होईल'

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : मनोरी किनारी सुरू असलेल्या रो रो जेट्टीचे काम पूर्ण झाल्यावर त्याचा सर्वाधिक वापर धनदांडग्यांना होईल. त्यातून गावपण व शांतता नष्ट होईलच, शिवाय रोजीरोटीही नष्ट होईल, अशी भीती मनोरी-गोराईतील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे मनोरीकर-गोराईकरांमध्ये चिंचोळे रस्ते असून या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रो रो जेट्टीसाठी १०० फुटी रस्ते एमएमआरडीए तयार करणार असल्याने येथील गावपण तर नष्टच होणार असून रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळ्यात उत्तन येथील सुमारे ६०० मच्छीमार बोटी मनोरी -गोराई किनारी शाकारून (नांगरून) ठेवतो, मात्र येथे रोरो जेट्टी झाल्यास आमच्या बोटी कुठे शाकारणार असा सवाल, धारावी बेट बचाव समितीचे अध्यक्ष जोसेफ गोंन्साल्विस यांनी केला. आधी येथील रस्ते चांगले करा, बाधित घरांचे येथे पुनर्वसन करा, आमच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवा, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

२०१७मध्ये आम्ही एमएमआरडीएच्या येथील पर्यटन विकास आराखड्याला जोरदार विरोध केला. एमएमआरडीएच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या लुडस डिसोझा आणि मनोरीचे यशवंत कोळी यांनी दिली.

जेट्टीचे काम वेगात सुरू
तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नोव्हेंबर-२०१८ मध्ये मार्वे-मनोरी रो रो जेट्टीच्या कामाचा मनोरी समुद्रकिनारी शुभारंभ झाला होता. या रो रो बोटीतून चारचाकी वाहने मार्वेवरून मनोरी, गोराई, उत्तनकडे जातील. एकावेळी १० चारचाकी वाहनांना आणि ५० प्रवाशांना या बोटीतून ये-जा करता येईल. चारचाकी वाहनांना सुमारे ४०० रुपये दर अपेक्षित असेल. मार्वे जेट्टीजवळील काम जवळजवळ पूर्ण झाले असून आता खाडीपलीकडील मनोरी किनारी जेट्टीचे काम सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री आलेली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त या कामासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे. येथे पोलीस दररोज परेड करतात, अशी माहिती गावकºयांनी दिली.

Web Title: 'Roe Jetty will destroy village, peace'